विजय जाधव / गोडोली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जुलै 2020 पासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलेल्या होत्या. सध्या कोरोनाचे संकट कमकुवत झाल्याने निवडणूक आयोगाने सदरच्या निवडणुका घेण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्यासंदर्भात प्रभाग रचना आणि आरक्षण अहवाल तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱयांना सुचना दिल्या असून डिसेंबर ते जानेवारी महिन्यात सदरच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
जुलै 2020 पासून मुदत संपली तरी कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने तहकूब करून पुढे ढकलल्या होत्या. प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू ठेवले असले तरीही अपेक्षित काम होत नाही. यावेळी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण अहवालास अंतिम मंजुरीबाबत दि. 30 ऑक्टोंबर अखेर राज्यातील जिल्हाधिकाऱयांना आदेश जारी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांना सूचना करताना मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा अहवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱयांकडून तपासणी करून जिल्हाधिकाऱयांनी अंतिम मंजुरी देण्यात यावी. या प्रक्रीयेसाठी दि. 27 ऑक्टोंबर ही मुदत जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकाऱयांनी त्यास दि. 2 नोव्हेंबर रोजी नमुना ‘अ’ मध्ये व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 च्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
राज्यातील तब्बल 14 हजार 600 च्या दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे आता गावोगावी गाव पुढाऱयांना निवडणुकीचा फिव्हर चढायला सुरुवात होऊ लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक राज्य आयोगाकडून नव्याने सुचना आणि नियमावली जाहीर होण्याची शक्यता असून त्याचे पालन करत निवडणूका पार पडतील.
काळजी घ्यावी लागणार….
कोरोनाच्या संसर्गाची धास्ती कमी झाली असून योग्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने निवडणूका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. कोरोना संपला नाही, तो पुन्हा गावाच्या हद्दीत येऊ नये, राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन करावे लागेल. प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे.