प्रतिनिधी/ गोडोली
जिल्हय़ात तब्बल 879 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवार 23 पासून सुरू होत आहे. योग्य उमेदवार निवडीपासून आवश्यक असणाऱया कागदपत्रांची जुळवा जुळवी करण्यासाठी पॅनेल प्रमुखांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक गावात दुरंगी तिरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीचा चांगलाच धुरळा उडणार आहे.
राज्यात आघाडी सरकार असले तरी गाव पातळीवर स्थानिक गटातच निवडणूक होणार आहे. भाजप बरोबर मनसेचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे. सुशिक्षीत वर्गातून उमेदवारीसाठी इच्छूक कमी असल्याने गाव पातळीवर उमेदवारांची जुळवा जुळव करणे अवघड झाले आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
बुधवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुरूवात होणार असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंत्तिम तारीख आहे. अर्जासोबत आवश्यक असणाऱया कागदपत्राची पूर्तता करून अर्ज ऑनलाईन भरावयाचा असल्याने त्याची धास्ती अनेकांना आहे . 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याचा दिवशी दुपारी 3 नंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 18 रोजी मत मोजणी होणार आहे. जिल्हय़ातील 879 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर अंत्तिम टप्प्यात पोहचली आहे.