तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर, अकलूज
अकलूज ग्रामपंचायतीची जागा बिनविरोध झाली. केवळ आपले दुर्लक्ष झाले. त्यामुळे आपल्या पॅनल विरुध्द एका वार्डातील जागा बिनविरोध झाली गेली. विरोधकांचा विजय झाला. या सर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार आहे अशी घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे केली.
अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील या बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्याविरोधात धैर्यशील मोहिते-पाटील आणि त्यांच्या पॅनलने एका सामान्य फळ विक्री करणाऱ्या महिलेची उमेदवारी दिली होती. मात्र, आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम त्या महिलेकडे जाऊन दोन कागदावर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. तर संबंधित महिला उमेदवाराच्या डमी अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलचा उमेदवार राहिला नाही प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही सर्वस्वी जबाबदारी मोहिते पाटील गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकतीने करू. त्यांना निवडून आणू. मगच राजकारणातून बाहेर पडू. असेही त्यांनी जाहीर केले.
अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती. तर यांच्या गटाच्या विरोधात धवलसिंह मोहिते-पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोध निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. परिणामी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यानिमित्ताने अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे राजकारण देखील आगामी काळात वेगळ्या वळणावर जाऊ शकते.