ऑनलाईन टीम / मुंबई :
ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात आपणच नंबर वनच स्थान पटकावले आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या तर शिवसेना आणि काँग्रेसने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेनेही चांगलाच जोर मारत राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी टि्वट करत लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगले करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असे सांगितले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. मनसेने अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवत ग्रामपंचायतीत झोकात एण्ट्री केली. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने दणदणीत विजय मिळवला.