- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
ऑनलाईन टीम / मुंबई :
विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी सभागृहातील गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले. मात्र, या विधेयकाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात घमासान पाहायला मिळाले. अखेर ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर होताच विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पटलावर मांडलेल्या ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. कोर्टात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, कोर्टाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे, कोर्टाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार नियुक्ती करा, अशी मागणी फडणवीसांनी केली.
यावर हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल निवडताना काही जाहिरात देता का? जो सुटेबल असेल तो व्यक्ती नेमतात ना? असा प्रतिप्रश्न केला. तसेच खासगी व्यक्ती आम्ही नेमत नाही, सरपंचांना मुदतवाढ देता येत नाही, तसा नियम नाही, असे स्पष्टीकरण देखील मुश्रीफ यांनी दिले.
मुश्रीफ यांना ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याची घाई झाली आहे, पण आम्ही नियमबाह्य पद्धतीने ते होऊ देणार नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, हे बिल वेगळं आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरु करण्यात आले. मात्र, एकूण 38 आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याने या अधिवेशनाला ये गैरहजर राहणार आहेत.