जि.प.च्या जलव्यवस्थापन बैठकीत प्रशासकांच्या सूचना : ग्रामपंचायतींना सूचना देण्याचे प्रशासकांचे निर्देश
प्रतिनिधी/कोल्हापूर
जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना असून त्याबाबत जिह्यात जाणीव जागृती झाली आहे. ती पारदर्शीपणे कार्यान्वित होण्यासाठी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी होणाऱया ग्रामसभेतही या योजनेचा आढावा घ्यावा. त्यासाठी जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीना तसे निर्देश द्या, अशा सूचना सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी जलव्यवस्थापन बैठकीत दिल्या.
हर घर नलसे जल या केंद्राच्या घोषवाक्यानुसार प्रत्येक कुटूंबाला 55 लीटर शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची अभिनव योजना आहे. केंद्र सरकारने जिह्याला 1264 योजनांचे उद्दीष्ठ दिले असून त्यापैकी 1132 योजनांचा म्हणजेच एकूण योजनेपैकी 94 टक्के योजनांचा डीपीआर तयार झाला आहे. या सर्व योजनांची माहिती नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसभेत ती सर्व माहिती देणे आवश्यक आहेच त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या परिसरात लोखंडी फलक करून आवश्यक ती माहिती प्रसिद्ध करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.
यापूर्वी अनेक गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेतून कामे पुर्णत्वास गेली आहेत. त्यावेळची मर्यादा ही प्रति माणशी 40 लिटरची असली तरी सध्याच्या मानकानुसार 55 लिटर पाणी देण्याची क्षमता या योजनांची आहे. अशा योजनांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या योजनांसह नविन योजनांच्या कामासाठी जीपीएस सिस्टम लागू करण्यात येणार आहे. पावसाळ्यामुळे अनेक गावातील प्रत्यक्ष काम सुरू नसले तरी पाईप घेणे वा अन्य साहित्यसामुग्री घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. चंदगड तालुक्यात 13 योजनांचा कार्यारंभ झाला आहे. यापैकी 7 योजनांचे काम सुरू आहे. तर 6 योजनांचे काम पावसाळ्यामुळे थांबले आहे.