प्रतिनिधी/ सातारा
ग्रामीण विकासामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, गटारे, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, वाचनालय या भौतिक सुविधांसोबत शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार या क्षेत्रांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. जकातवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम अभिनंदनास पात्र आहेत, असे सांगत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदयदादा कबुले यांनी दिली.
जकातवाडी येथे रियेटर इंडिया प्रा. लि., कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शाळेसाठी बेंच वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, सरपंच चंद्रकांत सणस, कार्यकारी अभियंता यशवंत लवटे, शाखा अभियंता गाढवे, गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ, दादासाहेब जाधव, हणमंत भोसले, उत्तम सणस, योगेश शिंदे, तुशांत माने, धनराज दौंडे, दीपक देवकर, अमोल कांबळे, प्रल्हाद पार्टे, दादासाहेब देसाई, शंकर दळवी, संजय सणस, विनायक मोहिते, सखुबाई देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उदय कबुले म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येणाऱया प्रस्तावांना ग्रामीण विकासाच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मान्यता देऊन जकातवाडीच नाहीतर संपूर्ण जिल्हय़ाच्या सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे सी. एस. आर. प्रमुख भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना शहरी शाळेसारख्या सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांना पाठीचे-मणक्याचे आजार होऊ नयेत यासाठी ही मदत देण्यात आली आहे. भौतिक सुविधेसोबत शाळांची गुणवत्ता सुद्धा सुधारली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. शिवाजीराव चव्हाण म्हणाले, जकातवाडीच्या विकासकामांना सढळ हाताने मदत करुन विकासकामांचा पाठपुरावा करु, असे सांगितले. सचिन जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकामध्ये सरपंच चंद्रकांत सणस यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भोसले यांनी केले. कार्यक्रमास सुजाता माने, सोनाली शिंदे यांच्यासह महिला बचतगटाच्या सदस्या व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.::