विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांचे प्रतिपादन : मलप्रभा नदीघाटाचे रेमाणी मलप्रभा नदीघाट नामांतर
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विशेषतः वनक्षेत्रातील रस्त्यांच्या विकासासाठी राज्याचे ग्रामीण विकासमंत्री ईश्वराप्पा तसेच ग्रामीण विकास खात्याच्या अप्पर सचिवांच्या उपस्थितीत लवकरच खानापूर येथे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीतूनच तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली जाणार आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केले. खानापूर येथे मलप्रभा नदीघाटाचे माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट असे नामांतर करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलप्रभा नदीघाट कमिटीचे अध्यक्ष आर. पी. जोशी होते.
कवटगीमठ पुढे म्हणाले, माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातूनच 2008 ते 2013 सालात खानापूर तालुक्याचा भरीव विकास झाला. त्यांनी मलप्रभा नदीघाट तसेच पूलवजा बंधाऱयाच्या कामासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याची चिरकाल आठवण रहावी, यासाठी नदीघाटाचे माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट असे नामांतर करून त्यांच्या कार्याची खऱया अर्थाने जाण ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी विशद केले. खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच वनक्षेत्रातील रस्त्यांच्या कामाला चालना मिळावी, यासाठी आपण हा प्रश्न विधानपरिषदेमध्ये उपस्थित करून त्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. सध्या खानापूर ते लेंढा महामार्गाचे काम उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडले आहे. मात्र यामुळे सदर रस्त्यावर अवलंबून असलेल्या जवळपास 34 गावातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्या लोकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पूर्वीप्रमाणेच तात्पुरता रस्ता करावा, अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली असल्याची माहितीही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना
दिली.
प्रारंभी माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट तसेच मलप्रभा नदीघाट सेवा ट्रस्ट कमिटीच्या नामफलकाचे अनावरण महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्याच हस्ते पंचमुखी महादेवाची पूजा करण्यात आली. यानंतर हरे कृष्ण मंदिरात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर मलप्रभा नदीघाट सेवा समितीचे सदस्य किरण यळळूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर प्रकाश देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मलप्रभा नदीघाट बांधकामाचा संपूर्ण इतिहास सादर करून यासाठी माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. तसेच या घाटातील दुसऱया टप्प्यातील कामाबरोबर मलप्रभेचे प्रदूषण टाळण्यासाठी भुयारी गटार योजना तसेच 7ƒ24 पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी महांतेश कवटगीमठ यांनी करण्याची विनंती केली. यावेळी अवरोळी मठाचे रुद्रस्वामीजींचे आशीर्वचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलप्रभा नदीघाट ट्रस्टचे सेक्रेटरी वसंत देसाई यांनी तर आभार नगरसेवक आप्पय्या कोडोळी यांनी मानले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मजहर खानापुरी, उपनगराध्यक्ष लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक सर्वश्री विनायक कलाल, विनोद पाटील, रफिक वारीमणी, मेघा कुंदरगी, तोईद चांदकन्नावर, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी तसेच तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.