तालुका म. ए. समितीची विभागीय नियंत्रण अधिकाऱयांकडे मागणी : अपुऱया बससेवेमुळे विद्याथीवर्गाचे हाल
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत झाली आहे. अपुऱया आणि अनियमित बससेवेमुळे प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना बसपास असूनदेखील खासगी वाहनांनी धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करून बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी तालुका म. ए. समितीतर्फे विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांची भेट घेऊन करण्यात आली.
बससेवा पूर्वपदावर येत असली तरी अद्यापही काही गावांची बससेवा बंद आहे तर काही गावांची वस्तीची बस ठप्प झाली आहे. शासनाने पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरळीत सुरू केले आहेत. याचबरोबर बाजारपेठही पूर्वपदावर आल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अपुऱया बससेवेमुळे प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बससेवेचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सकाळी आणि सायंकाळी ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र त्या तुलनेत बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांना दरवाजात लोंबकळतच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
ग्रामीण भागातील बससेवा कोलमडल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी रात्री उशिरा घरी पोहोचत आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यासावरही परिणाम होत आहे. तसेच काही बसचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना तासन्तास बसथांब्यावर ताटकळत थांबावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने बससेवा सुरळीत करून बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणीही तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
बसफेऱया येत्या आठवडय़ाभरात न वाढविल्यास पुन्हा विभागीय नियंत्रण अधिकाऱयांची भेट घेऊन मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर यांसह तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
बसपास प्रक्रियाही सुरळीत करा…
परिवहनकडून वितरित करण्यात येणारी बसपास प्रक्रिया सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास विलंब होत आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे बसपास काढताना प्रक्रिया किचकट वाटत आहे. त्यामुळे बसपास प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणीही तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.