पेयजल योजना ठरली कुचकामी : लाखो रुपयांचा चुराडा
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून पेयजल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गावोगावी जलशुद्धीकरण केंदे उभारण्यात आली. मात्र, यातील बहुतांशी जलशुद्धीकरण केंदे बंद पडली आहेत. परिणामी जलशुद्धीकरण केंद्रांसाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे.
वाढत्या उष्म्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावात पाणी समस्या गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत ही अभिनव योजना उपयुक्त ठरली असती. मात्र, जलशुद्धीकरण केंदे पाण्याविना बंद असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यापैकी पेयजल योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जनतेला पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता राबविलेली ही योजना कुचकामी ठरली आहे.
‘स्वच्छ पाणी प्या, निरोगी रहा’ अशा आशयाचा फलक या जलशुद्धीकरण केंद्रावर लावण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित नसल्याने स्वच्छ पाणी तर सोडाच नागरिकांना साधे पाणीदेखील मिळणे मुश्कील बनले आहे. संबंधित ग्राम पंचायती व लोकप्रतिनिधींनी ही केंदे सुरू करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
या योजनेंतर्गत गावोगावी जलशुद्धीकरण केंदे उभारली. याकरिता लाखो रुपये खर्ची घातले. प्रत्यक्षात मात्र जलशुद्धीकरण केंद्रे वापराविना शोभेची वस्तू ठरत आहेत. एक रुपया देऊन पाणी उपलब्ध होत होते. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीत पाणी नसल्याने शुद्ध पाणी कोठून मिळणार, असा प्रश्नही सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
अलीकडच्या काही वर्षात कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण, भूजलाची घटती पातळी, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणी पुरवठय़ावर ताण येत आहे. अशा कठीण काळात शासनाने राबविलेली ही योजना नागरिकांना उपयुक्त ठरली असती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने जनतेला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.