किराणा माल होलसेल मिळत नसल्याचे कारण पुढे : लुटीला आवर घालण्याची नागरिकांतून मागणी
वार्ताहर / उचगाव
किराणा माल होलसेल दरात मिळत नसल्याची सबब पुढे करत ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनी दुप्पट, तिप्पट दराची आकारणी करत मालाची विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांतून केली जात आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱया सर्वसामान्य कुटुंबांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गोरगरीब नागरिक भरडले जात असल्याने याला वेळीच आवर घालण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
सध्या राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात असल्याने तसेच शहरापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी आणि घरातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी सर्व नागरिक घरीच बसून आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वाहन घेऊन जाण्याची परवानगीसुद्धा नाकारण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या कारवाईला घाबरून नागरिक घरीच बसणे पसंत करत आहेत. यामुळे नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याचा परिणाम सध्या नागरिकांवर झालेला दिसून येत आहे. गावोगावी असलेल्या किराणा दुकानातून सकाळी सहा ते दहा या वेळेत खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, तालुक्मयातील काही गावातील किराणा दुकानदार ग्राहकांची लूट करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्राम पंचायतींनी लक्ष घालावे
तालुक्मयातील सर्व ग्राम पंचायतींनी आपापल्या गावातील किराणा दुकानदारांवर पाळत ठेवून कोणत्या मालाचे दर अधिक आहेत, याची शहानिशा करत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेशनचा पुरवठा रेशनिंग दुकानातून जरी मिळत असला तरी इतर जीवनावश्यक वस्तू व इतर बाबी आहेत त्या किराणा दुकानातूनच खरेदी कराव्या लागतात. मात्र, याचेच दर गगनाला भिडलेले असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र सध्या गावोगावी दिसून येत आहे.
दुकानदारांकडून अगोदरच स्टॉक
गावोगावी असलेल्या किराणा व्यापाऱयांनी यावषीही लॉकडाऊन होणार याची पूर्वकल्पना आल्यानेच किराणा मालाचा स्टॉक अगोदरच आणून ठेवल्याचे बोलले जात आहे. होलसेल दरात खरेदी करूनदेखील सध्या मालाचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करत अधिक पैसा कमावण्याच्या हव्यासाने किराणा दुकानदारांनी मालाचे दर वाढवल्याचे बोलले जात आहे. तरी यावर शासनाने कठोर करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
कामगारांचे जगणे झाले मुश्कील
दिवसभर राबल्यानंतर रात्री घरी चूल पेटते, अशी गत अनेक कुटुंबांची आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही तर दुसरीकडे किराणा मालाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. किराणा दुकानदार आपणाला होलसेल दरात माल उपलब्ध होत नसल्याचे सांगून हवे असेल तर माल घ्या, अशी जबरदस्ती ग्राहकांवर करून मालाचे दर वाढवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनाला आल्याने नागरिकांतून तक्रारी वाढत आहेत. यासाठी शासनाने तातडीने गावोगावी सर्वे करून किराणा दुकानदार माल अधिक दराने विकत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.