कोरोनामुळे यंदाचा पायीवारी सोहळा रद्द झाल्याचा परिणाम
सांगरूळ / प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने यंदा पायी वारी रद्द केली आहे. यामुळे ग्रामीण भागात पायी वारीच्या तयारीची लगबग यंदा दिसत नाही. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठू माऊलीच्या भक्तांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटकातूनही विठ्ठल नामाचा जयघोष करत भाविक मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे येत असतात. आषाढी वारी वारकरी संप्रदायाला जणू पर्वणीच असते. महाराष्ट्राच्या विविध भागातून लहान मोठे पालखी सोहळे आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होत असतात. या पालखी सोहळ्यामध्ये ग्रामीण भागातील विठ्ठलभकत पालखीच्या प्रस्थानाच्या अगोदर दोन दिवस गटागटाने सामील होत असतात. पन्नास साठ पासून ते अडीचशे तीनशेच्या पुढे संख्या असणारे वारकऱ्यांचे लहान-मोठे गट असतात. हे सर्व भाविक साधारणता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तयारी करत असतात. यामध्ये पंधरा-वीस दिवस आपल्या गटाला पुरेसं अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू जमा करणे, मुक्कामासाठी पाल व इतर साहित्याची जमवाजमव करणे यामध्येही भाविक व्यस्त असतात. पण चालू वर्षी अशी लगबग कुठेही दिसत नाही .
दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे चालू वर्षी शुक्रवार दिनांक १२ जून रोजी देहू येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचे तर शनिवार दिनांक १३ जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार होते. पण
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव, सल्लागार विठ्ठल जोशी आदीच्या उपस्थित बैठक होऊन चालू वर्षीची पायी वारी रद्द करण्याचा निर्णय झाला.
आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थानच्या पादुकांना राज्य शासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येणार आहेत . विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन घेणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. याप्रमाणेच आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करून परंपरा कायम ठेवली जाणार आहे .राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नाही.
पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत पालखी मार्गावर पादुकांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. विठूनामाचा गजर करत जाणाऱ्या या भाविकांच्या मुळे पालखी मार्गावर भक्तीचा सादर व संदन वाहत असतो .पण चालू वर्षी यालाही मर्यादा आल्या आहेत. दोन-तीन दिवस रात्रंदिवस रांगेत उभा राहून विठू माऊलीचे दर्शन घेतल्या शिवाय वारीतून न परतणाऱ्या वारकरीभक्तांची ही संख्या मोठी आहे. भाविकांना यावेळी प्रत्यक्ष पालखी सोहळ्यात सामील न होता दूरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या घ्यावा लागणार आहे. तसेच वारकरी संप्रदाय व सर्वांना पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे लागणार आहे.