वस्त्रनगरी फटाकेमुक्तीसाठी अजूनही असंवेदनशील
इचलकरंजी / विजय चव्हाण
येथे `माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो ग्रामपंचायतींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा ठराव केला आहे. प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामीण भाग इतकी संवेदनशीलता दाखवत असताना इचलकरंजीसारख्या शहरी भागातील नगर पालिका मात्र याबाबत कमालीच्या उदासिन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा ठेका फक्त ग्रामीण भागानेच घेतला आहे का, असा सवाल होत आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाद्वारे हवा प्रदूषण रोखण्यासाठी माझी वसुंधरा' अभियानांतर्गत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतींपैकी 722 ग्रामपंचायतींनी फटाकेमुक्त दिवाळी करण्याचे ठराव केले. उर्वरित ग्रामपंचायतीही असे ठराव करणार आहेत. लवकरच ते जिल्हा परिषदेकडे सादर होणार असल्याने यावेळी ग्रामीण भागात फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल, अशी अपेक्षा आहे. ही अभिमानास्पद बाब असली तरी शहरी भाग मात्र या अभियानाबाबत कमालीचा उदासीन आहे. इचलकरंजी येथे पालिकेच्यावतीने अजूनही या अभियानाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जिह्यातील सर्वात मोठी,
अ’वर्ग नगरपालिका असलेल्या इचलकरंजी पालिकेमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव तर सोडाच, पण याबाबत साधी चर्चाही पालिका पदाधिकाऱयांमध्ये झालेली नाही, हे विशेष.. उलटपक्षी फटाके स्टॉलना जागा द्यायची, आहे त्याच ठिकाणी फटाके विक्रीची परवानगी द्यायची, याचीच चर्चा अधिक दिसत आहे.
वास्तविक, इचलकरंजीची लोकसंख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. औद्योगिक शहर असल्याने येथे वस्त्राsद्योगाशी संबंधित कारखाने व अन्य उद्योग व्यवसायाची संख्या जास्त आहे. हवा प्रदूषणाची पातळी नेहमीच उच्च असते. कोरोना काळात दुषित हवेमुळे रूग्णांची स्थिती पाहता येथील हवा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर होता. खोकला, दमा सारख्या श्वसन विकारांच्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत किमान पालिकेने तरी `माझी वसुंधरा’ अभियानामध्ये ग्रामीण भागासारखी संवेदनशीलता दाखवून विचार करावा. फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव करून हवा प्रदूषणमुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.
प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामीण भाग नेहमीच अग्रेसर
यापूर्वीही प्रदूषणमुक्तीच्या प्रत्येक कार्यात ग्रामीण भाग अग्रेसर असल्याचे दिसून येते. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असो अथवा हवा प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड असो, याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळतो. पण अपवाद वगळता शहरी भागातून तितक्याशा प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही, हे वास्तव आहे. लोकसंख्या व आकारमानाचा विचार केल्यास प्रदूषणमुक्तीचे अभियान शहरात गांभीर्याने राबवणे आवश्यक आहे. पण दुर्देवाने तसे होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागाने कमावले व शहरी भागाने गमावले, अशी स्थिती वारंवार दिसत आहे.