अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाद्वारे युवकांना ग्रामीण बँकांद्वारे अर्थसहाय्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामीण सहकारी बँका सक्षम राहिल्याच पाहिजेत, पण याचवेळी मराठा समाजासह अन्य समाजांतील तरूणांना अर्थसहाय्य करून त्यांना आत्मनिर्भर केले पाहिजे. ग्रामीण सहकारी बँका तळागाळापर्यंत कार्यरत आहेत. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांद्वारे युवकांचे प्रस्ताव आल्यास त्यांना प्राधान्याने ग्रामीण बँका अर्थसहाय्य करतील. यासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण बँकाचे संघटन सप्ताहभरात उभारले जाणार आहे. त्यानंतर राज्यात ग्रामीण बँकांचे संघटनात्मक जाळे उभारले जाईल, अशी माहिती श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
येथील हॉटेल रेडियंटमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी बँकांच्या पदाधिकारी, अधिकार्यांची बैठक बुधवारी समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. बैठकीला 22 बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांकडून येणार्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. अन्य समाजांतील युवकांनाही उद्योग, व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यावर एकमत झाले. या बैठकीची माहिती घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण, अर्बन बँकांच्या या बैठकीला आजरा अर्बन बँकेचे अशोक पाटील, युथ बँकेचे चेतन नरके, विजय भोसले, कोल्हापूर अर्बन बँकेचे शिरीष कणेरकर, कुंभी बँकेचे दत्तात्रय राऊत, वीरशैव बँकेचे अनील सोलापुरे, सुर्यकांत पाटील, अण्णासाहेब चौगुले बँकेचे रवींद्र गोंदकर, श्रीपतरावदादा बँकेचे राजेश पाटील, डी. वाय. पाटील बँकेचे सोमनाथ मोती, भरत बँकेचे विठ्ठल मोरे, श्रीपाल अलासे बँकेचे अरूण अलासे, सन्मती बँकेचे अशोक पाटील, पैसाफंड बँकेचे अण्णासो भोजे, गणेश बँकेचे सदाशिव जोशी, व्यंकटेश्वरा बँकेचे पुनमचंद दरगड, मुरगुडच्या विश्वनाथ पाटील बँकेचे विश्वास चौगुले, गडहिंग्लज अर्बन बँकेचे राजेंद्र तारळे, जनता बँकेचे ए. बी. देसाई, यशवंत बँकेचे बी. एस. कांबळे, बिरदेव बँकेचे व्यंकाप्पा कुंभोजे, वारणा आणि पंचगंगा बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाने जिल्ह्यात 216 कोटींचे प्रस्ताव दिले आहेत. ग्रामीण, नागरी बँकांनी सकारात्मक दृष्टीने पाटील विकास महामंडळाच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. अन्य समाजातील तरूणांनाही उद्योगासाठी मदत करावी. नागरी बँका ग्रास रूटवर कार्यरत आहेत. त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पाटील महामंडळाने त्यांच्यावर विश्वास ठेवून पर्याय दिल्यास ग्रामीण बँकाही अशा तरूणांना पाठबळ देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
समरजितसिंह म्हणाले, विक्रमसिंह घाटगे कागल सहकारी बँकेने आजपर्यंत 75 कोटींचे कर्जवितरण केले आहे. नागरी बँकांसाठी बँकेने प्रकाश पाटील यांना समन्वयक नियुक्त केले आहे. प्रत्येक बँकेने आपला एक संचालक समन्वयक म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यातून सप्ताहभरात नागरी बँकांचा आराखडा तयार होणार आहे. राज्यात ग्रामीण, नागरी सहकारी बँकांचे क्षेत्र मोठे आहे. कोल्हापूरनंतर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर राज्यात या बँकांचे संघटन होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या भुमीतूनच सहकार क्षेत्राच्या संघटनासाठी हे पहिले पाऊल टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.