प्रतिनिधी/ बेळगाव
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच समजून घेण्यासाठी महिन्याच्या तिसऱया शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी ग्राम वास्तव्य करावे, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार शनिवार दि. 20 रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ बैलवाड (ता. बैलहोंगल) येथे ग्राम वास्तव्यासाठी गेले आहेत.
यावेळी त्यांनी गावातील विविध समस्या समजून घेतल्या. या ग्रामवास्तव्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱयांनीही जिल्हाधिकाऱयांचे स्वागत केले. गावातील बसवेश्वर मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. 25 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पदवीपूर्व महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महांतेश कौजलगी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यावेळी म्हणाले, सरकारच्या सर्व सोयीसुविधा यांचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी साऱयांनीच प्रयत्न करा. वेळोवेळी गावातील समस्यांसंदर्भात पाठपुरावा करून त्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. देवराज अर्स मागासवर्गीय वसतिगृहाला यावेळी त्यांनी भेट दिली. तेथेच त्यांनी भोजन केले. यावेळी त्यांच्या सोबत अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक चन्नबसप्पा कोडली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक डॉ. उमा सालीगौडर, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रविंद्र हकाटी उपस्थित होते.
गोळीबारामध्ये सीआरपी जवान मंजुनाथ मुदकनगौडर शहीद झाले होते. त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकाऱयांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बैलवाडबरोबरच त्याच्या बाजूला असलेल्या नागनूर व इतर गावांतील नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. गाव पातळीवरच या समस्या सोडवून तोडगा काढण्याची आशा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण गावामध्ये पायी चालत समस्या जाणून घेतल्या. हरिजन वाडय़ामध्ये जाऊन बहुसंख्य कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
करिअम्मा मंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजनही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी केले. स्वातंत्र्यसैनिकांची यावेळी विचारपूस केली. त्यांना तसेच वृद्धांना वेळेत पेन्शन मिळते की नाही याची संपूर्ण महिती त्यांनी घेतली. काही ठिकाणी विजेचे खांब कलंडले आहेत. त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱयांना त्या सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.