धामणे एस. गावात तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी-तहसीलदारांचे वास्तव्य
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण जनतेच्या समस्या अधिकाऱयांनी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱयांसह इतर अधिकाऱयांना ग्राम वास्तव्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांसह अधिकारी आता ग्रामीण भागात वास्तव्य करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊ लागले आहेत. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी आणि तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी धामणे एस. गावात शनिवारी वास्तव्य केले. त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
धामणे एस. हे गाव महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे. बेळगाव जिल्हय़ाचे शेवटचे गाव असून अत्यंत दुर्गम भागात हे गाव आहे. या ठिकाणी विजेची समस्या याचबरोबर रस्त्यांची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. याबाबत नागरिकांनी या दोन्ही अधिकाऱयांकडे समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सध्या असलेली ही इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेव्हा शाळेसाठीही विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
भारत स्वतंत्र होऊन बरीच वर्षे उलटली, तरी अद्याप आम्हाला वीज नाही, असे गाऱहाणे मांडण्यात आले. काही दिवसांपूर्वी वीजपुरवठा करण्यात आला तरी तो सुरळीत नाही, अशी तक्रारही नागरिकांनी केली. आम्ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत आहे. तेव्हा निर्माण झालेल्या या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी आणि तहसीलदारांनी समस्या जाणून घेतल्या. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. सुरुवातीला अधिकाऱयांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक ग्रामस्थांकडून तक्रारी ऐकून घेऊन अधिकाऱयांनी गावचा फेरफटका मारला. यावेळी तालुका पंचायत सदस्य नारायण नलवडे व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.