रविवारी प्रचाराचा झंझावात : सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा ग्राम पंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी हिंडलगा गावात ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचारफेरी काढून प्रचाराचा झंझावात करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात पाठिंबा व्यक्त केला. ग्राम विकास आघाडी पुरस्कृत सदस्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला.
ग्राम पंचायत निवडणुकीत अटीतटीची लढत सुरू असून, इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. मात्र, ग्राम विकास आघाडीने नवख्या तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकांना उमेदवारी देऊन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्राम पंचायत कार्यालयाचे कामकाज हायटेक बनत आहे. त्यादृष्टीने सुशिक्षित आणि तरुणांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. हा विचार समोर ठेवून ग्राम विकास आघाडीने जुन्या सदस्यांना प्राधान्य देण्याऐवजी नवख्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गावात सर्वत्र उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून प्रचारासाठी संपूर्ण गाव पिंजून काढण्यात आले आहे. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण गावात प्रचारफेरी काढण्यात आली.
ग्राम विकास आघाडीच्यावतीने वॉर्ड क्र. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 14 अशा वॉर्डमध्ये 20 उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळपासून प्रचारफेरी काढून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. याप्रसंगी लक्ष्मी गल्ली, मसनाई गल्ली, मरगाई गल्ली, रामदेव गल्ली, नवीन वसाहत, हायस्कूल रोड, सोमनाथ नगर, कलमेश्वर नगर, मास्ते नगर, सिद्धार्थ कॉलनी, मांजरेकर कॉलनी, लक्ष्मी नगर, श्रीराम कॉलनी, सिंडिकेट बँक कॉलनी, समर्थ कॉलनी, गोकुळ नगर, श्रीनाथ नगर, विजय नगर अशा विविध भागात फेरी काढून प्रचाराचा झंझावात करण्यात आला. यावेळी विकास आघाडीचा ध्येयधोरणांची माहिती देऊन नवख्या उमेदवारांना संधी देण्याची विनंती मतदारांना करण्यात आली. ग्राम विकास आघाडीने मागील निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या सदस्यांनी अनेक विकासकामे राबविली आहेत. याचप्रमाणे पुढील काळात गावचा विकास करून ‘सुंदर गाव’ बनविण्यासाठी नवख्या युवकांना संधी देण्याचे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात आले.
नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गावचा विकास करणाऱया तरुणांची गरज गावाला आहे. त्यामुळे जुनेच उमेदवार लादण्याऐवजी नव्या उमेदवारांना संधी देऊन गावचा विकास साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रचारावेळी करण्यात आले. प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्यात आला. गावातील विकासकामे राबविण्यासाठी एकीची गरज आहे. ग्राम विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या सदस्यांना निवडून आणण्यासाठी ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त केला. ग्राम विकास आघाडीच्या सर्व सदस्यांना भरघोस मतदान करून निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला. प्रचारफेरीत ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.