प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहकांच्या विश्वासावर लोकमान्य सोसायटीने आजपर्यंत प्रगती करून रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. लोकमान्यच्या प्रगतीमध्ये सातत्य असून ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल लोकमान्य परिवार कृतज्ञ आहे, असे मत लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे संचालक प्रसाद ठाकुर यांनी व्यक्त केले.
आर्थिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लोकमान्य सोसायटीच्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसाद ठाकुर बोलत होते. सोसायटीच्या गुरुवारपेठ येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन डॉ. डी. पी. वागळे, संचालक अजित गरगट्टी, पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, गायत्री काकतकर, सीएफओ वीरसिंग भोसले, सीईओ अभिजित दीक्षित, विभागीय व्यवस्थापक एम. एन. कुलकर्णी, साहाय्यक विभागीय व्यवस्थापक सी. आर. पाटील उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पंढरी परब यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, लोकमान्यने ग्राहकांना उत्तम सेवा देत प्रगती केली आहे. बाबुराव ठाकुर, माई ठाकुर यांचे आशीर्वाद, चेअरमन किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन सोसायटीला लाभले आहे. पारदर्शकता व विश्वास हे लोकमान्यचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे सोसायटीवर कोणतेही संकट आले तरी ते आम्ही परतवून लावू. समाजासाठी कार्यरत असणाऱया सोसायटीला ग्राहकांनीसुद्धा विश्वासाची पोहचपावती दिली असून प्रगतीचा आलेख वाढताच राहणार आहे.
यावेळी डॉ. डी. पी. वागळे यांनीसुद्धा सोसायटीमध्ये ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असून सोसायटी यापुढेही प्रगतिपथावर असणार आहे, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. यानंतर केक कापून रौप्यमहोत्सवी सोहळय़ाची पूर्तता साजरी करण्यात आली.