प्रतिनिधी /पणजी
ग्राहकांना आता तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा राज्य सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली असून अलिकडेच त्याचा शुभारंभ झाला आहे. ई – दाखिल (e-daakhil) असे त्या असे त्या पोर्टलचे नाव असून ग्राहकांना यापुढे ग्राहक तंटा निवारण आयोगाकडे प्रत्यक्षात जाण्याची गरज भासणार नाही. ते घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर तक्रारी दाखल करु शकतात. ज्यांना ऑनलाईन तक्रारी देणे शक्य नाही त्यांना प्रत्यक्षात आयोगाकडे जाऊन तक्रारी देण्याची सोय कायम ठेवण्यात आली आहे.
ग्राहकांना प्रथम त्यासाठी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल व नंतर तक्रारी देता येतील. जिल्हा किंवा राज्य ग्राहक तंटा निवारण आयोग अशा दोन्ही ठिकाणी पोर्टलवरुन तक्रारी देता येतील. पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच तक्रारी देण्यासाठी आवश्यक असलेली फी ऑनलाईन भरण्याची सुविधाही पोर्टलवर देण्यात आली आहे.
नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहारमंत्री गोविंद गावडे यांनी त्या पोर्टलचा शुभारंभ केला. ज्यांची फसवणूक झाली असेल त्या ग्राहकांनी आयोगाकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन गावडे यांनी केले आहे. तक्रारदार, ग्राहकांसह प्रतिवादींना देखील उत्तरे ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर देता येणे शक्य आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचे काय झाले याची माहिती पोर्टलवर मिळणार आहे. तसेच जर आयोगाने काही निकाल दिला तर तो देखील पोर्टलवर ग्राहकांना पाहता येणार आहे. त्यामुळे आता ग्राहक आयोग देखील ऑनलाईन बनला आहे.