प्रतिनिधी / पणजी
राजधानीतील मुख्य मार्केटमध्ये भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढत आहेत तर काही भाज्यांचे दर उतरत आहेत. मागील आठवडय़ात भाज्यांचे दर काहीसे कमी होते. परंतु आता टॉमेटो, बटाटा, गाजर, दोडकी यासारख्या भाज्यांचे दर चढेच आहेत. कांद्याचे दर मात्र कमी असून सध्या 20 रूपये किलो या दराने कांदा बाजारात विकला जात आहे. मागील काही दिवसांत मार्केटमध्ये ग्राहक कमी प्रमाणात येत असल्यामुळे काहीसा परिणाम भाजीपाल्यावरही होत आहे. बेळगावहून गोव्यात भाजी नियमित येते. परंतु ग्राहक कमी आणि भाजीचे दर जास्त अशी स्थिती सध्या बाजारात दिसून येत आहे.
सध्या बाजारात टॉमेटो 40 रूपये, बटाटा 40 रूपये, कांदा 20 रूपये, भेंडी 40 रूपये, चिटकी 40 रूपये, बीट 40 रूपये किलो, गाजर 50 रूपये किलो, वांगी 40 रूपये किलो, मिरची 60 रूपये किलो, वालपापडी 40रूपये किलो, फ्लावर 30 रूपये, वाली 40 रूपये किलो, दोडकी 50 रूपये किलो, शेवग्याच्या शेंगा 20रूपये, कोथिंबीर 20 रूपये जुडी, पालक 5 रूपये एक. मेथी 15 रूपये एक या दराने विकले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी मार्केट परिसरात कोरोना रूग्ण सापडल्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांनी येणे कमी केले. पहिले काही दिवस तर बहुतांश ग्राहक मार्केट संकुलात फिरकलेच नाहीत. परंतु हळुहळु ही स्थिती बदलत असून मार्केट संकुलात ग्राहकांची वर्दळ सुरू होत आहे.