सलग दुसऱया महिन्यात जिओला टाकले मागे : ऑक्टोबरमध्ये 36.7 लाख नवीन ग्राहक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारती एअरटेलने नवीन ग्राहक जोडणीत रिलायन्स जिओला ऑक्टोबर महिन्यात सलग दुसऱयांदा पाठीमागे टाकले असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांच्या ताज्या आकडेवारीतून उपलब्ध झाली आहे. भारती एअरटेलने ऑक्टोबरमध्ये 36.7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. यासोबतच भारती एअरटेलच्या वायरलेस ग्राहकांची संख्या वाढून 33.02 कोटींवर पोहोचली आहे.
ट्रायच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये रिलायन्स जिओने 22.2 लाख नवीन मोबाईल ग्राहक जोडले आहेत. यासह रिलायन्स जिओची एकूण ग्राहकांची संख्याही वधारुन 40.63 कोटी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 26.5 लाख ग्राहकांनी मात्र 26.5व्होडाफोन-आयडियाची सोबत सोडली असून कंपनीची एकूण ग्राहक संख्या घटून 29.28 कोटी राहिली आहे. तसेच दुसऱया बाजूला सरकारी कंपनी बीएसएनएलला 10,208 आणि एमटीएनएलला 7307 आणि रिलायन्स कम्युनिकेशनला 1488 ग्राहक गमवावे लागले आहेत.
दूरसंचार ग्राहकांमध्ये वाढ
ऑक्टोबर 2020 मध्ये देशातील सर्वसाधारण दूरसंचार ग्राहकांच्या बेसमध्ये वाढ झाली आहे. सदरच्या वाढीसोबत संख्या 117.18 कोटी झाली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 116.86 कोटी होता. एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या 114.85 कोटीने वधारुन 115.18 कोटी राहिली आहे.
वायरलाईन सेगमेंटमध्ये जिओचे 2.45 लाख ग्राहक
वायरलाईन सेगमेंटमध्ये ऑक्टोबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वात अधिक 2,45,912 ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएलची 1,76,408 वायलाइन ग्राहकांनी सोबत सोडली आहे. रिलायन्स कम्युनिकेशनचे 1,60,470 ग्राहक वेगळे झाले आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात देशातील ब्रॉडब्रँड ग्राहक बेसमध्ये 1.7 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.