प्रतिनिधी / कोल्हापूर
अर्थकारणाच्या विविध समूहातील शुध्दीकरणाचा प्रकल्प म्हणून ग्राहक पंचायतीने आपली ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार आखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी काढले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरच्यावतीने मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी पदाधिकारी जिल्हा दौऱ्या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन गायकवाड बोलत होते.
ग्राहक चळवळीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद आणि संस्थापक अध्यक्ष, बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ग्राहक पंचायत ही शोषणमुक्त समाज निर्मिती हे ध्येय घेऊन कार्यरत असणारी चळवळ असल्यामुळे कार्यकर्त्यांनी अभ्यास करून कार्य करावे, ग्राहकांच्या तक्रार निवारणावर भर द्यावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले. कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करण्यासाठी विविध विषयात पारंगत बनून अशासकीय समित्यावर कार्यरत राहून ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी लढावे, असे प्रतिपादन मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक बाळासाहेब औटी यांनी यावेळी सांगितले. प्रांत सचिव भालचंद्र पाठक यांनी केंद्र स्तरावरून आलेल्या प्रांत, जिल्हा आणि तालुका स्तरावरील नवनियुक्त्यांच्या रचनेच्या मांडणी विषयी सांगत मासिक बैठका, इतिवृत, मार्गदर्शन केंद्र, पददायीत्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्वागत प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी केले. प्रांत कार्यकारणी सदस्य एन.ए. कुलकर्णी यांनीही आपले संघटनात्मक विचार मांडले.