प्रतिनिधी / बेळगाव
ग्राहकांमुळे उद्योग-व्यवसाय वृद्धींगत होत असतो. त्यामुळे प्रत्येक उद्योजकांनी ग्राहक महत्त्वाचा हे भान कधीही विसरू नये, असे मत ब्ल्यू पाईन आर्ट्सच्या संचालिका तृप्ती करिजिन्नी यांनी व्यक्त केले.
आविष्कार व आयएमईआर यांच्यातील करारानुसार गुरुवारी आयएमईआरच्या सभागृहात तृप्ती यांनी आपल्या उद्योगाबाबत अनुभव कथन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मी स्वतः जलरंग तयार करते. यासाठी 5 हजार वर्षांपूर्वीचे पारंपरिक तंत्र अंमलात आणले आहे. या रंगांमुळे चित्र खराब होत नाही, आणि दीर्घकाळ टिकते.
प्रारंभी माझी काही चित्रे सोशल मीडियावर घातली आणि त्याला हजारो फॉलोअर्स मिळाले. या चित्रांना मागणी आल्याने त्यांच्या विक्रीमुळे मला बऱयापैकी उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे मी नोकरी सोडली. जानेवारी 2018 मध्ये मी पूर्णवेळ कलाकार म्हणून काम करू लागले. मला ज्या दर्जाचे रंग हवे होते ते भारतात उपलब्ध नव्हते. त्यामुळे एक दिवस आपणच रंग तयार करायचे ठरविले आणि त्यानुसार प्रचंड जिद्दीमुळे त्यामध्ये यशस्वी झाले.
उद्योगासाठी जिद्द महत्त्वाची. तसेच प्रथम आपण ग्राहकाचा विचार करायला हवा. त्याला उत्पादन नव्हे तर सेवा देत आहोत, ही भावना ठेवा. दर्जा उत्तम असल्यास लोक किमतीचा विचार करत नाहीत. मात्र, पॅकेजिंगसह उत्पादन गुणवत्तेच्या निकषावर उतरणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
यानंतर सुनील कुलकर्णी यांनी आरोग्यदायी जीवनासाठी योगासनाची प्रात्यक्षिके दाखविली. प्रारंभी अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रसिका कडोलकर यांनी केले.