नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे : वेळेत वेतन देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत कर्मचाऱयांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आम्ही काम करत आहे. मात्र अजूनही कंत्राटी पद्धतीनेच वेतन दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे वेतन वेळेत दिले जात नाही. त्यामुळे आम्ही विविध समस्यांना तोंड देत आहोत. तेव्हा तातडीने आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेऊन वेतन द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी जिह्यातील ग्राम पंचायतमधील कर्मचाऱयांनी जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून निदर्शने केली.
ग्राम पंचायतमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी जमा करणे यासह इतर कामे करत आहोत. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्व वसुली करत आहोत. याचबरोबर कोरोना काळात जनजागृतीसह इतर कामे आम्ही केली आहेत. मात्र, आम्हाला वेतन वेळेत दिले जात नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहे. आम्हाला केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. तेव्हा तातडीने आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलन करू, असा इशारा या कर्मचाऱयांनी दिला आहे.
व्ही. पी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जे. ए. जैनेखान यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते..