मुख्यमंत्री येडियुराप्पांचा विरोधकांवर हल्ला : काँग्रेस पूर्णपणे संपल्याचा दावा
बेळगाव : ग्राम पंचायत निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस-निजद पूर्णपणे धुळीला मिळाले आहेत. अधिकाधिक ग्राम पंचायतींवर भाजप समर्थक उमेदवार निवडून आले आहेत. आता तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीतही मोठी कामगिरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभात येडियुराप्पा म्हणाले, पैसा, दारू, मनगटाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, अशी आजवर काँग्रेसशी समजूत होती. मात्र, मतदारांनी ती खोटी ठरवली आहे. कर्नाटकात झालेल्या 15 पैकी 12 पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मतदारांचे अभिनंदन केले आहे.
पुढच्या विधानसभा निवडणुकीत किमान 150 जागांवर विजय मिळवायचा आहे. कर्नाटकात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे. उत्तर कर्नाटकात तर निजदचा कुठेच पत्ता नाही. नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांनी गावातील प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन गावच्या विकासासाठी झटावे. महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सुरेश अंगडी यांचे स्मरण करताना पोटनिवडणुकीत त्यांचे ऋण फेडायची जबाबदारी तुमच्यावर आहे. उमेदवार कोणीही असला तरी किमान दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्क्मयाने त्याला निवडून दिले पाहिजे. तरच सुरेश अंगडी, राजू चिक्कनगौडर व रवि हिरेमठ यांना ती श्रद्धांजली ठरणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे बोलले तसे चालले. 370 कलम हटविले. राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. या नेत्यांनी अनेक उपक्रम राबविले. कर्नाटकात 45 हजार भाजप पुरस्कृत ग्राम पंचायत सदस्य निवडून आले आहेत. सुमारे 3 हजार 500 ग्राम पंचायतींवर भाजप पुरस्कृतांची सत्ता आली आहे. आता ग्रामीण भागातही भाजपचा विस्तार वाढलेला पाहायला मिळतो आहे.