प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील ग्राम पंचायतींची मुदत संपुष्टात आल्याने निवडणुका घेण्याच्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालविली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सामग्री स्थानिक निवडणूक विभागाला पाठविली असल्याने बेळगाव तहसीलदार कार्यालयात ग्राम पंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे.
ग्राम पंचायतींच्या लोकनियुक्त सभागृहाचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. ग्राम पंचायत निवडणूक घेण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. मात्र, राज्य निवडणूक विभागाने ग्राम पंचायत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने तयारी चालविली आहे. निवडणुकीबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर केले आहे. ग्राम पंचायतींचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. पण केवळ राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची गरज आहे.
राज्यातील महापालिकांच्या सभागृहांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. पण काही महापालिकांची वॉर्ड पुनर्रचना व आरक्षण नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक घेण्यासाठी तयारी झालेली नाही. मात्र, आगामी काळात महापालिका निवडणुका घेणे आवश्यक आहे. मे महिन्यात जिल्हा व तालुका पंचायतींची मुदत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणूक घेणे आवश्यक आहे. अशा विविध निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. सध्या ग्राम पंचायत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीकरिता लागणारी सामग्री स्थानिक निवडणूक विभागाला पाठविण्यात आली असल्याने स्थानिक निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.