सावंतवाडी आगारात सुविधा
सावंतवाडी:
एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून कोल्हापूर, पुणे, मुंबई व रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्हय़ात जाणाऱया 22 प्रवाशांचे ग्रुप बुकिंग उपलब्ध झाल्यास एसटीची सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी आगाराच्या नियंत्रण कक्षात नावनोंदणी करावी, असे आवाहन आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे एसटी बससेवा 22 मार्चपासून बंद आहे. एसटी बंद राहिल्याने ग्रामीण भागासह राज्यातील अनेक जिल्हय़ात जाणाऱया व येणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्याचा परिणाम एसटी महामंडळाबरोबरच व्यापारी वर्गालाही बसला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या आदेशानुसार जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक फेऱया सुरू केल्या आहेत. सावंतवाडी आगारातून कणकवली, दोडामार्ग, ओरोस, कुडाळ, बांदा, वेंगुर्ले अशा काही फेऱया सुरू करून व्यवस्था केली. मात्र, प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
आता महामंडळाच्या आदेशान्वये सावंतवाडी आगारातून अन्य जिल्हय़ात जाणाऱया प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह अन्य जिल्हय़ात जाणाऱया 22 प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रथम नावनोंदणी करावी. त्यानंतर त्यांना प्रवासाची वेळ दिल्यानंतर त्यांनी आपला वैद्यकीय दाखला व आधारकार्ड (सत्यप्रत) जोडणे आवश्यक आहे. दरदिवशी 22 प्रवासी एका जिल्हय़ात जाण्यासाठी उपलब्ध झाल्यास त्याच दिवशी बस सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी स्थानकातील नियंत्रण कक्षात सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.
एसटी मालवाहतूक सेवा
सावंतवाडी आगारातून पार्सल, मालवाहतूक सेवा करण्यात आली आहे. व्यापारी, उद्योजक व खासगी व्यक्तींना आपल्या मालाची मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात पार्सल वाहतूक करता येणार आहे, अशी माहिती खराडे यांनी दिली.
सध्या कणकवली, ओरोस, कुडाळ, बांदा, दोडामार्ग व वेंगुर्ले या गाडय़ा आगारातून सुरू केल्या आहेत. 22 प्रवाशांसाठी ही सेवा सुरू आहे. या प्रवासासाठी कोणतेही जादा शुल्क आकारले जात नाही. प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.