शालेय क्रीडा स्पर्धांना ब्रेक मात्र कायम, क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची माहिती
संग्राम काटकर / कोल्हापूर
गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव फारच कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले. पण पहिली ते आठवीपर्यंतची शाळा सुरू केलेल्या नाहीत. कोरोना संसर्गाचा धोका टळला नसल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 9 वी ते 12 वीपर्यंतच्या वर्गाअंतर्गत 17 आणि 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्याची तयारी ठेवलेली नाही. गेली 8 महिने बंद ठेवण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा भविष्यातही कधी सुरू होतील, हेही निश्चित नाही. असे असले तरी यंदा दहावी, बारावीला शिकत असलेल्या खेळाडूंना त्यांची खेळातील मागील गुणवत्ता तपासून ग्रेस गुण देण्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सकारात्मकता दर्शवली आहे.
मार्च महिन्यात देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याचा प्रादुर्भाव नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणाऱ्या जून महिन्यापर्यंत वाढतच गेला होता. संसर्ग होऊन मुलांच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने राज्यातील शाळाच बंद केल्या. याचवेळी पुढील काही महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी मुला-मुलींना शाळेत न पाठविण्याचा पालकांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे शाळेत मुला-मुलींची गैरहजैरी राहणार हेच निश्चित झाले होते. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, तोपर्यंत स्पर्धा होणारच नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळालेले होते. याचबरोबर यंदा दहावी व बारावीच्या वर्गात गेलेल्या खेळाडूंना जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्याबद्दल दिले जाणारे ग्रेस गुण मिळणार की नाही, असा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सुदैवाने महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची स्थिती ऑक्टोबरपासून कमी होऊ लागल्याने दिवाळीनंतर सर्व शाळा, कॉलेज सुरू होऊन क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतील, अशी चर्चा राज्यभर होत होती. अशातच शासनाने गेल्या महिन्यापासून 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्गही सुरू केले. मात्र आठवीपर्यंतची शाळा सुरू करण्याची जोखिम स्वीकारलेली नाही. त्यामुळे 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार हे निश्चित झाले. तसेच 9 वी ते 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुला-मुलींसाठी 17 आणि 19 वर्षाखालील या वयोगटांअतर्गतही स्पर्धा न घेण्याची क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची ठाम भूमिका आहे.
फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो-खो, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, कुस्ती, ज्युदो, तायक्वांदो, कराटे, तलवारबाजी यासह अनेक खेळांच्या स्पर्धां खेळताना खेळाडूंचा एकमेकांशी बॉडी कॉन्टॅक्ट होत असल्याने कोरोनाची संसर्ग होण्याची मोठी भीती संचालनालयाला देखील आहे. भीतीपोटी गेली 8 महिने बंद ठेवलेल्या क्रीडा स्पर्धा भविष्यात केव्हा सुरू होतील, याचे संकेत राज्यातील क्रीडा कार्यालयांना दिलेले नाहीत. दुसरीकडे महाराष्ट्र कोरोनामुक्त झाल्याशिवाय शालेय क्रीडा स्पर्धा नकोच असाही पालक वर्गाचा सुर असल्याने भविष्यात आणखी किती काळानंतर स्पर्धांचे आयोजन होऊ शकते याचीच सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खेळाडूंचे नुकसान होणार नाही
शालेय क्रीडा स्पर्धेत दहावी, बारावीच्या वर्गातून खेळलेल्या खेळाडूंना जिल्हा स्तरासाठी 3, विभागासाठी 5, राज्यासाठी 10, राष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी 15 आणि पदक असेल 20 तर आंतरराष्ट्रीय सहभागासाठी 20 व पदक असेल 25 असे ग्रेस गुण खेळाडूंना दिले जातात. यंदा मात्र कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या खेळाडूंच्या स्पर्धा होणार नसल्या तरी त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्याशी चर्चा करून ग्रेस गुण देण्याबाबत सकारात्मकच निर्णय घेऊ.
ओमप्रकाश बकोरिया (आयुक्त : क्रीडा व युवक सेवा संचालनलय)