ऑनलाईन टीम / ग्वाल्हेर :
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात एक भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली असून यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस निरिक्षक रवी भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला धडक दिली. मरण पावलेल्या माहिलांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करत घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो!
मी आणि मध्य प्रदेशमधील जनता या दु:खद प्रसंगी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून 50 हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी माहितीही चौहान यांनी यावेळी दिली आहे.