मातीला सुध्दा किंमत आली, खाऊ पान शेकडा 50 ते 60, ड्रायप्रूट किलोमागे 200 ते 300 रूपयांने वाढ, निशिगंधाचा दर किलोला 50 वरून 250 रूपये
प्रतिनिधी/ कोल्हापूर
महापूर, कोरोना यामुळे गेल्या दोन वर्षातातील सण,उत्सव बंद होते. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला होता. शासनाने नवरात्रीसाठी देऊळे उघडण्याची परवानगी दिल्याने, भाविकाबरोबर दुकानदारामध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱया वस्तू व नऊ दिवसाच्या उपवासासाठी लागणारे पदार्थ, फळे, फुले,खाऊ पान आदींच्या खरेदीसाठी महाव्दार रोड, जोतिबा रोड, शिवाजी चौक परिसरात खरेदीची गर्दी झालेली दिसत होती.
नऊ दिवस उपवास असल्याने यासाठी लागणाऱया सुकडी, मिक्सड कडधान्य पाकीट, अगरबती झाड, केरसुणीची विक्री महापालिका परिसरात सुरू आहे. याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. सणासाठी खाऊ पानाची मागणी वाढली आहे. शेकडा 20 ते 30 रूपये असलेला खाऊपान आता 50 ते 60 रूपये शेकडा झाला आहे. दोन वर्षापूर्वी घटस्थापनेला हाच दरं 100 रूपयापेक्षा जास्त झाला होता.घटस्थापनेला लागणाऱया वस्तूंचे दर पुढीलप्रमाणे. सुकडी-10,कोहळा-50 ते 100, पाच कडधान्याचे पाकीट 5 ते 10 रूपये, अगरबती झाड-2 ते 5, पत्रावळी -5, रेशीम गोंडा 15 ते 30, बुट्टी 40, केरसुणी-60,लहान केरसुणी-20,पत्रावळी 5 तर मातीला सुध्दा दर आल्याने, मापटया,चिपटया मापानुसार 5 ते 10 रूपयाला माती विकली जाऊ लागली आहे.
घटस्थापनेसाठी लागणाऱया वस्तूसाठी ड्रायफूट व किराणा दुकानामध्ये सुध्दा खरेदीला गर्दी होत आहे. उपवासाठी लागणाऱया खजूर ,सुकामेवा व फळांची मागणी वाढत आहे. उपवासाला लागणाऱया खजूरमध्ये जायदी, काळी व फरद असे प्रकार असून याचा दर 80 पासून 300 रूपये किलो असा आहे. तर मिक्स ड्रायप्रूट 800 रूपये किलो आहे. अफगाणिस्थान संघर्षामुळे ड्रायफूटच्या दरामध्ये किलोला 200 ते 300 रूपयांनी वाढ झाली आहे.काळा मनुका 600,अंजीर 1200,जर्दाळू 500, वेलदोडे 1800 ते 2200 असा झाला आहे.
किराणा दुकानामध्ये दसऱयाची खरेदी सुरू
नवरात्रीसाठीच्या याद्या किराणा दुकानमध्ये सुरू झाल्या आहेत. खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 5 रूपयांनी घसरण झाली आहे. कडाकणी पीठ, रवा, मेदा, पिठीसाखर, लिसा साखर, हरभराडाळ, खोबरे याच्या याद्या सुरू झाल्या आहेत. सध्या तरी या वस्तूचे दर स्थिर आहेत. याचे दर पुढीलप्रमाणे (एक किलो व रूपये)कडाकणी पिठ-80, रवा-36, मैदा-32, पिठीसाखर -48, लिसा साखर -60, साखर-40, खोबरे-200, किसलेले खोबरे-210, हरभराडाळ-76, खडीसाखर-48 ते 80 रूपये.
उपवासासाठी फळे व पदार्थ
फळांचे दर 60 पासून 100 रूपये किलो आहेत.रताळयाची मागणी वाढल्याने आवकही वाढली आहे. तर उपवासाठी लागणाऱया पदार्थांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. बटाटा चिवडा-280, लाल शाबू चिवडा-240,पांढरा शाबू चिवडा-240,राजिगरे 12 लाडूचे पाकीट 20 रूपये,बटाटा शेव-440, वेफर्स-300, केळी वेफर्स-280,रताळे-50 .
घटस्थापनेमुळे फुलांच्या दरात वाढ
गेल्या दोन दिवसापासून फूलांच्या दरात वाढ झाली आहे. येथून पुढे दसरा,दिवाळी असल्याने फूलांच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे फूलविक्रेते महादेव घाटगे यांनी सांगितले. 50 रूपये किलो असणारी निशिगंध फूलांचा दर आता 250 रूपये झाला आहे. गलाटा 100,शेवंती 150,मखमली 80, झेंडू 60.