ऑनलाइन टीम / बारामती :
महाराष्ट्राची सत्ता योग्यवेळी आपल्या हातात आली आहे. चांगली वेळ जुळून आली आहे. घडय़ाळवाले आता आमचे पार्टनर झालेत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले आहे.
बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ‘कृषिक 2020’चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमीर खान, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे तसेच आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.
ते म्हणाले, या जागी माळरान होते, त्याठिकाणी शरद पवारांनी नंदनवन उभे करून दाखविले आहे. महाराष्ट्राची भूमी चमत्कार करणारी आहे. इथे कायम चमत्कार जन्माला येतोच. मुंबईत मी आतापर्यंत खूप प्रदर्शने बघितली. पण बारामतीतील हे प्रदर्शन वेगळे आहे. इथे प्रात्याक्षिकासह माहिती दिली जाते. जर आज मी या कार्यक्रमाला आलो नसतो, तर एका मोठय़ा अनुभवाला मुकलो असतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.