आमदार उमेश कत्ती यांची माहिती
प्रतिनिधी/ संकेश्वर
शहरात बेघर असलेल्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जमिनीचा अभाव आहे. त्यामुळे गत 5 वर्षांपासून घरकुल योजना राबविणे अडचणीचे बनले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता शहरानजीक असणाऱया हरगापूरगडाच्या गायरान जमिनीतील 50 एकर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. तेथे एकाचवेळी 1400 घरे निर्माण करण्याची योजना हाती घेतल्याची माहिती आमदार उमेश कत्ती यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
शहरात सध्या पूरग्रस्त वसाहत, डॉ. आंबेडकर निवास योजना, इंदिरा आवास, राजीव गांधी निवास योजना, वाजपेयी निवास योजना व बसव निवास योजना आदी योजना अस्तित्त्वात आहेत. गत 5 वर्षात बेघरांच्या संख्येत झालेली वाढ पाहता जमिनीचा तुटवडा भासू लागला आहे. यासाठी सोलापूर गायरान जमिनीतील 32 एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. शिवाय करजगी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असणारी हरगापूरगड ग्रामपंचायत हद्दीतील 50 एकर गायरान जमीन तातडीने ताब्यात घेऊन आगामी अडीच वर्षात 1400 घरकुले निर्माण करण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक घराचा लाभ पात्र कुटुंबालाच मिळणार आहे. लाभार्थी निवडण्याचे काम पारदर्शक होणार आहे. नगर परिषदेकडे सध्या 2000 अर्जांची यादी तयार असून पहिल्या टप्प्यात 1400 तर दुसऱया टप्प्यात 600 घरकुले निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार कत्ती यांनी यावेळी दिली.