लहान-मोठय़ा आजारांवर वनस्पती आणि त्यांची मुळे यांच्यापासून बनविलेली औषधे उपयोगात आणण्याची पद्धती भारतात हजारो वर्षांपासून आहे. मध्यंतरीच्या काळात ऍलोपॅथिक औषधांचा दबदबा वाढल्यानंतर अशी ‘गावठी’ औषधे घेणे अनेकांना कमीपणाचे वाटू लागले. तथापि, सध्याच्या कोरोनाकाळात आधुनिकातील आधुनिक औषधेही कुचकामाची ठरू लागल्यानंतर लोकांचे लक्ष पुन्हा ऐतिहासिक औषध पद्धतीकडे म्हणजेच आयुर्वेदाकडे वळू लागले आहे. आयुर्वेदिक औषधांची घरगुती पद्धतीने निर्मिती हा आता छत्तीसगडमध्ये रोजगाराचा एक मार्ग बनला आहे. कोरबा येथे महिलांचा एक स्वयंसाहाय्य गट निर्माण करण्यात आला असून त्याला घरगुती पद्धतीने औषधे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोरबा जिल्हय़ाच्या वनमय भागात औषधी वनस्पतींचे अनेक प्रकार आढळतात. हा भाग अशा वनस्पतींचे आगरच मानला जातो. तेथून विविक्षित वनस्पती व त्यांची मुळे या महिला गोळा करतात आणि घरी त्यांच्यापासून यंत्रांचा कमीत कमी वापर करून घरगुती पद्धतीने औषधे, काढे, गुटी इत्यादी प्रकार तयार करतात. या औषधांना मोठी मागणी असून तयार करताना स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळण्यात येतात. ही औषधे घेणाऱया काही रुग्णांचे अनुभव प्रेरणादायी आहेत. विलासपूर येथील 70 वषीय बैशाखीनबाई यांना मधुमेहाचा तीव्र त्रास होता. पण वनस्पतीजन्य औषधे घेऊ लागल्यापासून आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत नाही, असे त्या म्हणतात. मधुमेहावरील औषधे हे या महिलागटाचे विशेष उत्पादन आहे. आता या औषधांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.