प्रतिनिधी / पेठ वडगाव
लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ व्हावी याकरिता सर्वपक्षीय निर्णयानुसार बुधवार दि. ९ रोजी वडगाव बंद जाहीर करण्यात आले होते. हा बंद सर्वपक्षीय होता. मात्र मंगळवारी देशव्यापी बंद असल्या कारणाने सलग दोन दिवस वडगाव बंद ठेवणे योग्य होणार नाही अशी भुमिका झालेल्या चर्चेत व्यापारी बंधूंनी मांडली. यामुळे घरगुती वीज बील माफीसाठी प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या साखळी पद्धतीने गाव बंद आंदोलनात वडगाव शहराचा उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी बुधवार दि.१६ डिसेंबर रोजी वडगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पेठ वडगाव बंदबाबत गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयानुसार वडगाव पालिका नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी बुधवार दि.९ रोजी वडगाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. यास विविध पक्षांनी पाठींबा दिला होता. तर यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांच्या वतीने नगरसेवक जवाहर सलगर यांनी या वीज बिल माफीसाठीच्या आंदोलनास पाठींबा दिला होता. मात्र यानंतर काही दिवसांतच मंगळवार दि.८ रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भारत बंद पुकारण्यात आला आहे. सलग दोन दिवस वडगाव बंद ठेवल्याने व्यापारी, व्यावसाईकांचे नुकसान होणार असल्याने वडगाव येथे हा बंद पुढे ढकलण्यासाठी आज पुन्हा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी मत व्यक्त करताना म्हणाले, अगोदरच कोरोनामुळे सर्वजण मेटाकुटीला आलेले आहेत. यात शेतकरी असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील सर्वांचे नुकसान झाले आहे. वीज बील माफीसाठी सर्वसामान्य जनतेसाठी सुरु असलेल्या गाव बंद आंदोलनाला सर्व व्यापारी व्यावसाईकांचा पाठींबा आहे मात्र सलग दोन दिवस वडगाव बंद ठेवणे नुकसानीचे आहे. यामुळे या विषयावर चर्चा होवून वडगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी वीज बील माफीसाठी असलेला हा बंद पुढे ढकलण्याची भूमिका मांडली.
या बैठकीतील निर्णयानुसार बुधवार दि.९ रोजीचा वडगाव बंद पुढे ढकलून हा बंद १६ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वडगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, नगरसेवक संतोष गाताडे, जय शिवराय किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, महालक्ष्मी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी शरद काशीद, भूषण विभुते, वडगाव भाजपा अध्यक्ष जगन्नाथ माने, माजी अध्यक्ष धनंजय गोंदकर, प्रज्योत शहा, सलीम बागवान, सुनील लाड, अनिल हिरवे यांचेसह व्यापारी-व्यावसाईक उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात महावितरण कंपनीने घरगुती वीज बिले दुप्पट करून पाठवली आहेत. याबाबत ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच गावांनी साखळी पद्धतीने बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील बरीच गावे बंद झाली आहेत व होत आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी सुरु असलेल्या या गाव बंद आंदोलनास वडगाव शहरातील सर्व व्यापारी, उद्योजक, नागरिक यांनी पाठिंबा देऊन १६ डिसेंबरचा वडगाव बंद यशस्वी करूया असे आवाहन जयशिवराय किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी केले.