ही कहाणीही काही कल्पक यशस्वी महिलांची आहे. कानपूर येथील घाटमपूर येथे या महिलांनी घरचा चहा, आयुर्वेदिक चहा आणि घरीच बनविलेली चॉकलेट्स इतकी प्रसिद्ध केली आहेत, की आता त्यांची उत्पादने जगप्रसिद्ध ब्रँड्सनाही टक्कर देत आहेत. या महिलांचा लोणची, पापड आणि मुरंबा बनविण्याचाही व्यवसाय आहे. पण त्यालाच जोड म्हणून त्यांनी बनविलेली ही नवी उत्पादनेही आता त्यांच्या आर्थिक आधारस्तंभ बनली आहेत, असे दिसून येते.
लोणची, पापड आदी व्यवसाय करणारे अनेकजण असल्याने त्यातून लाभ जास्त होत नाही, हे लक्षात आल्यानंतर या महिलांनी नवी उत्पादने तयार करण्याचा विचार केला. सध्या कोरोना काळामुळे लोक अधिक प्रमाणात पारंपरिक अन्नपदार्थांना प्राधान्य देत आहेत. तसेच आयुर्वेदिक आणि वनस्पतीजन्य वस्तूंचे प्रमाण आहारात वाढले आहे. या बदललेल्या सवयींचा लाभ उठविण्यासाठी या महिनांनी घरगुती चहा आणि हर्बल टी (वनस्पतीयुक्त चहा) च्या नव्या पाककृती शोधून काढल्या आहेत. नव्या चवीचा हा चहा लवकरच ग्राहकांच्या पसंतीला उतरल्याने त्याचा खप मोठय़ा प्रमाणात वाढला. शिवाय हा घरातच बनविला जात असल्याने त्यात शरीरावर विपरीत परिणाम करणारे रासायनिक पदार्थ नसतात. त्यामुळे तो प्रकृतीला चांगला असतो असा ग्राहकांचा अनुभव असल्याने या चहावर ग्राहकांच्या उडय़ा पडतात. आता या महिलांनी सोयाबिन पासून तयारे केलेले दूधही (सोयामिल्क) बाजारात आणले आहे. या दुधात चरबीचे प्रमाण कमी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्यांना सामान्य दुधाची ऍलर्जी असते त्यांच्यासाठी हे दूध वरदान सिद्ध झाले आहे. ते पचायलाही प्राणीज दुधापेक्षा हलके असते. कोरोना काळात लोक आपल्या शरीर स्वास्थ्याविषयी अधिक जागृत झाल्याने या दुधाला चांगलीच मागणी आहे. घरगुती निर्मितीमुळे या पदार्थांमध्ये भेसळही नसते. अर्जुन, गुलाब, अश्वगंधा आणि इतर आयुर्वेदिक वनस्पतींपासून हा चहा बनविला जातो. गेल्या दोन वर्षांमध्ये या चहाला राज्याबाहेरुनही मागणी वाढली आहे. भविष्यकाळात तो विदेशात निर्यात करण्याचीही या महिलांची योजना आहे. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन राष्ट्रीय आजिवीका अभियानाच्या वतीने त्यांना 1 लाख 10 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. त्यातून आता त्यांनी आपला व्यवसाय आणखी वाढविला असून मार्केटिंगही सुधारले आहे.