आमदार रवी नाईक यांची सूचना
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनचा कार्यकाळ 30 एप्रिलपर्यंत वाढवून जनतेसाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू तसेच गोमंतकीयांच्या आवडीचे मासे घरपोच पुरविण्याची सोय करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. सरकारचा हा निर्णय चांगला असला तरी व्यावहारिकदृष्टय़ा अडचणीचा आहे. कारण मासे किंवा इतर वस्तूंमध्ये लोकांच्या आवडीनिवडी असतात. शिवाय अशा वस्तूंची घरपोच सेवा कठीण होणार आहे. त्याला पर्याय म्हणून प्रत्येक घरासाठी एक परवाना दिल्यास लोक सामाजिक अंतर ठेवून योग्यप्रकारे आवश्यक वस्तू खरेदी करू शकतील. सरकारने या पर्यायाचा विचार करावा, असे फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सरकारी कर्मचारी व बिलएलओमार्फत प्रत्येक कुटुंबप्रमुखाच्या नावे खरेदीसाठी परवाना दिल्यास ते योग्य होईल. घरातील एकच माणूस खरेदीसाठी बाहेर पडल्यास दुकानातही फारशी गर्दी होणार नाही व लोक आपल्या आवडीनिवडीनुसार खरेदी करू शकतील, असे रवी नाईक म्हणाले. सध्या राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती सुधारण्यासाठी महसूलवाढीचीही तेवढीच गरज आहे. त्यामुळे इतर व्यवहार सुरु राहाणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्य ही प्राथमिकता असली तरी सुरक्षित अंतर ठेवून महसूलवाढीसाठी आवश्यक असलेले व्यवहार सुरु ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कोरोनासंबंधी जे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे त्याला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही रवी नाईक यांनी केले.
राज्यातील परप्रांतीय मजूर हा बांधकामक्षेत्र व इतर व्यावसायातील महत्त्वाचा घटक आहे. या मजुरांना कंत्राटदार व सरकारने जीवनावश्यक वस्तू पुरवितानाच खर्चासाठी थोडे पैसे देणेही गरजेचे आहे. मान्सूनपूर्व कामे व इतर कामांसाठी या मजुरांची आवश्यकता आहे. गोव्यात त्यांची गैरसोय झाल्यास गावात परतलेला मजूर पुन्हा गोव्यात येणे कठीण आहे. हा मजूर उपलब्ध न झाल्यास अनेक कामे खोळंबून पडण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्याला पैशांची गरज असल्याने उद्योजक व इतर व्यावसायिकांनी मुख्यमंत्री निधीत आपल्या कुवतीनुसार जास्तीत जास्त निधी जमा करून या आणिबाणीच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार रवी नाईक यांनी केले.