प्रतिनिधी /बेळगाव
राजीव गांधी वसती योजनेंतर्गत अनेकांना घरे मंजूर झाली होती. ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे शहापूर, खासबाग परिसरातील अनेक घरे पडली होती. त्या कुटुंबांनी रितसर अर्ज केले होते. मात्र त्यांना केवळ दोन ते तीन हप्ते देण्यात आले आहेत. अजून बरीच रक्कम देणे बाकी आहे. त्यामुळे घरांचे बांधकाम करणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने रक्कम द्यावी, अशी मागणी शहापूर, खासबाग परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जोरदार पावसामुळे 2019 मध्ये अनेकांची घरे कोसळली. त्यामुळे त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. त्या सर्वांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत.
काही जणांना तीन ते चार हप्ते दिले गेले आहेत. मात्र इतर रक्कम अजूनही दिली गेली नाही. 5 लाख रुपये घरासाठी मंजूर झाले होते. तेव्हा उर्वरित रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. राजशेखर बाबुराव संकपाळ, शिवानंद बी., बसण्णा बी. यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.