रेवाडी-झज्जर महामार्गावरील मस्तापूर या गावात आजही राजेंद्र सिंह हे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. अतिशय आदरानं आणि गर्वानं ते उच्चारलं जातं. हे 1965 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकाचं नाव आहे. आज हे गावच त्यांच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं आहे.
त्यांचा जन्म 5 जून 1943 चा. अगदी बालपणापासून त्यांचं स्वप्न सैनिक होण्याचं होतं. सरकारी शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे शिक्षण होत असतानाच, त्यांना गावातीलच सैनिक भीम सिंह यांनी सेनेत भरती होण्यग्नाची प्रक्रिया सांगितली. मुलानं शिकून कोठेतरी चांगली नोकरी करावी, असं आईचं मत होतं. पण राजेंद्र यांना सेनेतच जायचं होतं. अखेर त्यांनी घरी न सांगताच सेनेत प्रवेश घेतला. त्यांचे पिताही पुरस्कारप्राप्त सैनिकच होते.
6 ऑगस्ट 1963 या दिवशी ते सैन्यात गेले. रानीखेत सीमेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1964 मध्ये त्यांचा विवाह झाला. तथापि, 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलं. परिणामी, सेनेत भरती झाल्यापासून दोनच वर्षांमध्ये त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जावं लागलं. अर्थात, याला त्याची ना नव्हतीच. पण दुर्दैवानं ते धारातीर्थी पडले. त्यावेळी त्यांची कन्या अवघ्या नऊ महिन्यांची होती.
या घटनेला आज 45 वर्षांहून अधिक वर्षे लोटली आहेत. गावात आज या घटनेपासूनची तिसरी पिढी रहात आहे. तरीही या शूर सैनिकाची स्मृती गावकऱयांच्या मनात आहे. या घटनेपासून प्रेरणा घेऊन या गावातील अनेक युवक सेनेत गेले आहेत. त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.