राणी चन्नम्मानगर येथील प्रकार : पूर्वसूचना न देताच स्मार्ट सिटीचे काम सुरू केल्याने रहिवाशांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र ही कामे सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना पूर्वसूचना दिली जात नाही. राणी चन्नम्मानगर दुसरे स्टेज येथे गुरुवारी सकाळी गटार बांधकामासाठी अचानकपणे खोदाई करण्यात आली. त्यामुळे घरातील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
स्मार्ट सिटी योजनेच्या कामाची सुरुवात करून पाच वर्षे झाली. पण कंपनीच्या कंत्राटदारांना जनतेच्या समस्यांचे काहीच देणे-घेणे नाही, अशी बाब निदर्शनास आली आहे. नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी स्थानिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. तशी अट कंत्राटदारांना घालण्यात येते. पण निविदेत असलेल्या सर्व अटी धाब्यावर बसून स्मार्ट सिटी योजनेचे काम करण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. सदर कामे नियोजनबद्ध व्यवस्थित नसल्याने याचा फटका सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येणार असून गटारीचे बांधकाम केले जाणार आहे. याकरिता जेसीबीने रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा मोठी चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. घरातून बाहेर निघताच थेट खड्डय़ात पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांना घराबाहेर ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
अचानकपणे केलेल्या खोदाईचा फटका विशेषतः वृद्ध नागरिकांना बसला आहे. नागरिकांची वाहने घरात अडकल्याने शहरात कसे जायचे, असा मुद्दा निर्माण झाला आहे. पूर्वसूचना देऊन कामाची सुरुवात केली असता पर्यायी व्यवस्था करता येणे शक्मय होते. पण स्मार्ट सिटीच्या घिसाडघाईच्या कामामुळे राणी चन्नम्मानगरमधील रहिवाशांचे हाल होत आहेत. निर्माण झालेल्या समस्येबाबत कोणत्या ठिकाणी तक्रार करायची याबाबत कोणतीच माहिती जनतेसाठी उपलब्ध करण्यात आली नाही. सध्या निर्माण झालेल्या समस्येबाबत कोणाकडे तक्रार करायची, अशी विचारणा होत आहे. स्मार्ट सिटी आणि प्रशासनाच्या बेजबाबदार कामाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.