प्रतिनिधी / बेळगाव :
महापूरामुळे मागील वषी अनेकांची घरे कोसळली. मात्र घरे कोसळलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याऐवजी इतरांनाच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे खरोखरच ज्यांची घरे कोसळली आहेत ते नुकसान भरपाईपासून वंचित असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकऱयांचे आंदोलन असल्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पावसामुळे जिह्यातील अनेकांची घरे कोसळली आहेत. त्या घरांचा सर्व्हे योग्य प्रकारे करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. सरकार नुकसान भरपाई दिल्याचे जाहीर करत आहे. मात्र नुकसान भरपाईपासून अनेक गरीब कुटुंबे वंचीत आहेत. जोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवू, असा इशारा शेतकऱयांनी यावेळी दिला.
भर पावसामध्ये गुरुवारी सकाळपासूनच शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. गरीबांना नुकसान भरपाई देण्याऐवजी अनेक श्रीमंतांनाच नुकसान भरपाई दिली गेली आहे. राजकीय व्यक्तींच्या दडपणाखाली नुकसान भरपाई दिल्याचा आरोपही यावेळी शेतकऱयांनी केला. घरे पडलेल्यांचा सर्व्हे करा आणि त्यांनाच नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत सरकारचा तीव्र निषेध नोंदविला.
यावेळी रवी सिध्दमण्णावर, राजू मरवे, औरामीमठाचे स्वामी व इतर शेतकरी उपस्थित होते.