प्रतिनिधी/ बेळगाव
पावसामुळे घराचे नुकसान झाल्यास मागीलवषी 5 लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र यंदा नुकसान भरपाईच्या रक्कमेत कपात करण्यात आली असून, घराची पूर्ण पडझड झाल्यास केवळ 95 हजार 100 रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि पावसामुळे घराचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांची राज्य शासनाने घोर निराशा केली आहे.
मागील वषी पुराच्या पाण्यात आणि पावसामुळे 1200 हून अधिक घरांचे नुकसान शहर व उपनगरात झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तीन लाख ते पाच लाखापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली होती. राजीव गांधी आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी निधीची तरतूद करून राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. मात्र यंदा राज्य शासनाने नुकसानग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने चार महिने लॉकडाऊन होते. या कालावधीत सर्वांनाच आर्थिक नुकसानीचा भुर्दंड बसला. त्यानंतर कोरोनाच्या रूग्णांची वाढ झाल्याने धास्ती निर्माण झाली होती. त्यामुळे व्यवसाय ठप्पच होते. अशातच जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे पावसामुळे नुकसान अशा द्विधा अडचणीत सापडलेल्या नागरिकांकडे शासनाने देखील दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेंतर्गत 95 हजार 100 रूपयाची मदत नुकसानग्रस्तांना देण्यात येते. या रक्कमेसह पाच लाखाची रक्कम घर बांधण्यासाठी राज्य शासनाने देवू केली होती. मात्र यंदा या नुकसान भरपाईच्या रक्कमेत कपात केली असून, घराची संपूर्ण पडझड झाल्यास केवळ 95 हजार 100 रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. घराची पडझड झाल्यास सर्वेक्षणानंतर नुकसानीनुसार भरपाई मिळणार आहे. पावसामुळे घराचे 25 टक्क्मयापर्यंत नुकसान झाल्यास 5,200 रूपये, 25 ते 75 टक्के नुकसान झाल्यास 50 हजार रूपये, आणि 75 टक्क्मयाहून अधिक नुकसान झाल्यास 95 हजार 100 रूपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आता सरकारकडून तटपुंजीच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यापूर्वी लॉकडाऊन काळात विविध योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देताना शासनाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे घराचे बांधकाम कसे होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.