महाराष्ट्रात गेले काही वर्षे विविध राजकारण्यांच्या जिभा सातत्याने घसरत आहेत. जोडे मार आंदोलनही नित्याचे झाले आहे. प्रत्येक पक्षाने आणि नेत्याने घसरणाऱया जिभा सांभाळल्या आहेत. सोशलमीडियाची, वॉररुमची ती गरज झाली आहे. पण या सर्व चिखलफेकीत आपण कोठे निघाले आहोत याचे कोणालाच भान उरलेले नाही. शिवसेनेत सरळ फूट पडून दोन भकले झाली असताना जे सत्तांतर झाले त्या सत्तांतरानंतरचे लहान-मोठे धक्के थांबलेले नाहीत. या साऱया गदारोळात खोक्यांचे राजकारण जसे चर्चेत आले तसे नव्याने काही प्रवक्ते आणि भाषण बहाद्दर प्रकाशझोतात आले. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नव्याने पुढे आलेल्या नेत्या यांचाही उल्लेख या प्रकाशझोतात आलेल्या मंडळीत करावा लागेल. शिवतिर्थावर त्यांनी जे भाषण केले ते गाजले व त्याला शरद पवारांसह अनेकांनी टाळी दिली. सुषमा अंधारे या महाविद्यालय जीवनात वक्तृत्व स्पर्धा गाजवणाऱया म्हणून फेमस होत्या. आता तोच अनुभव त्यांना राजकीय व्यासपीठावर उपयोगी पडत आहे. शिवसेनेचे या आधीचे प्रवक्ते, ज्यांचा टिकाकार विश्व प्रवक्ते म्हणत ते संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. पण सुषमा अंधारे यांनी राऊत यांची जागा पुरेपूर भरुन काढली आहे. भाजपावर आगपाखड, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांची भलावण आणि तीच ठाकरी भाषा, तोच बाणा त्यामुळे प्रकाशात आलेल्या अंधारेबाई चमचमणार. मागे-पुढे संजय रावतांची जागा घेणार हे वेगळे सांगायला नको. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महिलेला संधी द्यायची तर सुप्रिया सुळे यांचा अग्रक्रमाने विचार करावा लागेल. त्यापाठोपाठ पंकजा मुंढे आणि निलम गोऱहे यांचा विचार होऊ शकतो, असे म्हटले आहे. महाराष्ट्र पुरोगामी वगैरे म्हणतात. पण महाराष्ट्रात आजवर एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. तुलनेने उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये महिलांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलेले याकडे यांनी लक्ष वेधले आहे. शिवसैनिक संजय राऊत यांना उगाचच दोष देत होते आणि त्यांचा ओढा शरद पवारांकडे आहे असे म्हणत होते. पण प्रवक्ता बदलला, महिला प्रवक्ता नेमला, नव्याने शिवबंधन बांधून आलेल्या महिलेला संधी दिली पण ती ही तेच गाणे गाते आहे. यातच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची भूमिका लक्षात यावी. महाराष्ट्राला राजकारणाचा, समाजकारणाचा आणि सुसंस्कृतपणाचा मोठा वारसा आहे. पण अलीकडे इकडून तिकडे उडय़ा, फोडाफोडी, जमावाजमवी, खोकी, डोकी असे करत सत्ता मिळवायची आणि तिजोरी लुटायची अशी स्पर्धाच चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे. पण त्याचे भान कोणालाच नाही. भाजपाने यावेळी लोकसभेसाठी ज्या जागा टार्गेट केल्या आहेत त्यामध्ये बारामतीची जागा आहे. तेथे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेला उभारतात व विजयी होतात. पूर्वी शरद पवार तेथून निवडून येत पण अलीकडे त्यांनी निवडणूक लढवणार नाही म्हणत राज्यसभा पसंत केली आहे. महाविकास आघाडी प्रयोगाची देशभर चर्चा झाली त्यांचे कर्तेकरवते शरद पवार हा प्रयोग सत्तेतून पाय-उतार अस्वस्थ असणे स्वाभाविक आहे. सत्तेशिवाय या मंडळींना भाकरी गोड लागत नाही. ओघानेच करामती, चमत्कार यासाठी काय सुरु असते, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुहूर्ताच्या वेळा सांगायला सुरुवात केली आहे. भाजपाने बारामती टार्गेट केले असले तरी अर्वाच्य शिवराळ भाषेत टिका-टिप्पणी व संताप महाराष्ट्राला कोणालाच मान्य होणारा नाही. सुप्रिया सुळे यांच्याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शिवराळ भाषा आणि अशोभनिय वक्तव्य करुन हसे करुन घेतले आहे. सत्तार यांचा बोलवता धनी कोण हे सांगता येणार नाही. कारण महाराष्ट्रात अनेक अदृश्य हात कार्यरत असतात. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील वगैरे मंडळी वादात सापडली आहेत. राहूल गांधींची देशात भारत जोडो यात्रा सुरु आहे तर महाराष्ट्रात जोडा मारो आंदोलन पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा, महिला कार्यकर्ते संतापले आहेत. शरद पवारांनी पावसात भिजून पहिला प्रयोग यशस्वी केला. आता हाताला बँडेज बांधून शिर्डीत केलेले भाषण गाजते आहे. देशभर पायी हिंडून दाढी वाढवून राहूल गांधी आपली नवी प्रतिमा आणि काँग्रेसला बळकटी देऊ पाहत असले तरी देशात भाजपाचे वारे वाहते आहे. अलीकडेच देशात झालेल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने चार जागी विजय मिळवला. बिहार, तेलंगणा येथे भाजपाला क्रमांक दोनची मते मिळाली. काँग्रेसला कुठेही म्हणावे तसे यश मिळाले नाही. राहूल गांधींनी तेलंगणातून भारत जोडो सुरु केले तेथेही पोटनिवडणुकीत यश नाही आणि गांधी काल नांदेड वगैरे भागात होते. तो मुहूर्त साधत सुषमा अंधारे यांनी सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले. राहूल गांधी वेगवेगळय़ा भागात वेगवेगळे फेटे, रुमाल, टोप्या लेऊन इमेज उभी करत आहेत. पक्षाला त्यांनी नवा अध्यक्षही दिला आहे. पण काँग्रेसमधील ओहोटी थांबायला तयार नाही. हिमाचल प्रदेशमध्ये चार दिवसावर मतदान आले असताना प्रदेश पातळीवरील 26 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेसला ऐन लढाईत खिंडार पडून झटका बसला आहे. काँग्रेसचे एकेकाळचे बालेकिल्ले पार नामशेष व्हायची वेळ आली आहे. अशावेळी नवं काही शिजवायचा प्रयत्न सुरु आहे. बारामतीची लढाई सोपी दिसत असली तरी सोपी नाही. राजकारण साधताना राजकारणाचा स्तरही सांभाळला पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन भाषणे, टिका, लोक गंमत म्हणून पाहत असले तरी ते लोकांना पसंत आहे असे समजू नये. कोणत्याही पक्षात, गटात किंवा कामात महिला असेल तर तिचा योग्य सन्मान राखला पाहिजे. टिका, मतभेद, वैचारिक लढा, पक्षीय संघर्ष समजू शकतो पण कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळले तर जनता माफ करणार नाही. सर्वत्र विजय मिळाला पाहिजे पण त्यासाठी सद्मार्ग हवा. मनसे नेते राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा निषेध केला आहे. राज ठाकरे यांनी तर बिनशर्थ माफी मागा असे म्हटले आहे. संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी दगडफेक केली. प्रकरण चिघळले आहे. सर्वानीच विचार करुन बोलले पाहिजे. राजकारण्यांच्या जिभा सातत्याने घसरु लागल्या तर महाराष्ट्र माफ करणार नाही.
Previous Articleवीज,धातू क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.