प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हय़ाचे विभाजन करण्यात आले तर जोयडा, हल्याळ शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि मुंदगोड या घाटमाथ्यावरील तालुक्यासाठी निर्मिती करण्यात येणाऱया जिल्हय़ाचे मुख्यालय यल्लापूर येथे असले पाहिजे, अशी मागणी जिल्हा पालकमंत्री आणि कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांच्याकडे करण्यात आली. राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली यल्लापूर जिल्हा केंद्र संघर्ष समितीची स्थापना अलिकडेच केली आहे. नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री हेब्बार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून कारवार जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यासाठी कारवार मुख्यालय असलेला एक जिल्हा व दांडेली, जोयडा, हल्याळ, शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर या सात तालुक्यांचा समावेश असलेल्या तालुक्यासाठी आणखी एक जिल्हय़ाची निर्मिती व्हावी, अशी चर्चा रंगली आहे. कारवार जिल्हय़ाच्या अखंडत्वाला म्हणजे सर्व बारा तालुके मिळून एकच जिल्हय़ाला आपली सहमती आहे, असे स्पष्ट केले आहे.
जर सरकारने जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला तर, नवीन जिल्हय़ाचे मुख्यालय (केंद्र) यल्लापूर येथे असले पाहिजे. कारण यल्लापूर हे नगर घाटमाथ्यावरील अन्य तालुक्यासाठी मध्यभागी असून सोयिस्कर आहे. म्हणूनच नवीन जिल्हा अस्तित्वात आला तर मुख्यालय यल्लापूरच झाले पाहिजे असा आग्रह केला आहे.
मंत्री महोदयांशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणणार
निवेदन स्वीकारून शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन संबंधिताकडे पाठविण्यात येईल, त्याचबरोबर शिष्ट मंडळाच्या मागणीनुसार या प्रकरणी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यात येईल, असे सांगितले.
या शिष्टमंडळात यल्लापूर तालुका पंचायत सुनंददास कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष वेणुगोपाल दुग्गाणी, निवृत्त प्राचार्य बीरण्णा नायक, श्रीरंग कट्टी, निवृत्त तहशीलदार डी. जी. हेगडे, तुळसी पालेकर, ऑटोरिक्षा चालक मालक संघाचे अध्यक्ष संतोष नाईक, भाजप नेते प्रसाद हेगडे, नागेश यल्लापूर, किरण बेडसगद्दे आदींचा समावेश होता.