कराडमधील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
प्रतिनिधी/ चिपळूण
सातारा जिल्हय़ात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी या जिल्हय़ातून
येणाऱया जीवनावश्यक वस्तूंवर बुधवारपासून बंदी घातली आहे. त्यामुळे 2 मेपर्यंत भाजीपाला, फळे, अंडी, कोंबडय़ा, शेळय़ा, बोकड यांची वाहतूक पूर्णपणे थांबणार आहे. यासाठी महत्वाचा असलेला कुंभार्ली तपासणीनाका आणखी अलर्ट करण्यात आला आहे.
शहरासह तालुक्याला लागणारा सर्व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा घाटमाथ्यावरून होतो. गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे संकट असतानाही येथून या जीवनावश्यक वस्तू येथे आणल्या जात आहेत. मात्र आता सातारा जिल्हय़ातील कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने संपूर्ण कराड, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापिल, सदापूर, बनवडी, गोटे, वारूंजी, मुंढे व कोयना वसाहत ग्रामपंचायत क्षेत्र हे कंटेन्मेंट झोनमध्ये ठेवण्याच्या अनुषंगाने या क्षेत्रामध्ये मनाई आदेश लागू केलेला आहे.
रत्नागिरी व सातारा जिल्हय़ांची हद्द चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट तपासणीनाका ही असून त्यापासून पुढे सातारा जिल्हय़ातील पाटण तालुक्याची हद्द सुरू होते. या दोन्ही जिल्हय़ांच्या सीमेवर कुंभार्ली तपासणीनाका आहे. चिपळूण तालुक्यात भाजीपाला, अन्नधान्य, अंडी, चिकन, मटण तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक कराड, पाटण, मलकापूर या भागातून दररोज होत आहे. या भागातून येणारी वाहने कुंभाली नाक्यावर तपासून नंतर पुढे सोडली जातात. 25, 26 व 27 एप्रिल या तीन दिवसात कुंभाली तपासणी नाक्यावरून भाजीपाल्याच्या 107 गाडय़ा, कांद्याच्या 30, लोटे कंपनीच्या 76, रूग्णवाहिका 3, ई पास असलेल्या 4, पेट्रोल, डिझेल व गॅस वाहतुकीच्या 37, दूधच्या 100, फळांच्या 38, सिमेंट वाहतुकीच्या 14, कोंबडी वाहतुकीच्या 10, अंडय़ाच्या 23, रिकाम्या 65, तर 103 अशा एकूण 610 वाहनांची वाहतूक झाली असून त्यातून 974 व्यक्तींचा प्रवास झाला आहे.
कराड, पाटण व लगतच्या भागामध्ये दररोज कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत आहे. त्याच भागातून चिपळूण व लगतच्या तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव अशा वाहने व व्यक्तींमुळे चिपळूण व लगतच्या तालुक्यात होण्याची शक्यता गृहित धरून आतापर्यंत जिल्हय़ात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात आलेल्या यशाला तडा जाऊ नये म्हणून भाजीपाला, अंडी, चिकन ,मटण यांची वाहतूक करणाऱया वाहनांना बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव प्रांताधिकारी पवार यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रांताधिकाऱयांनी 2 मेपर्यंत वाहने बंदी आदेश काढला आहे.
कुंभार्ली नाका अलर्ट
या बंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून पुंभार्ली तपासणी नाका आणखीनच अलर्ट करण्यात आला आहे. येथे अलोरे-शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे पोलिसांसह पोलीस मित्र शिक्षक, मंडल अधिकारी, तलाठी, आरोग्य सेवक तैनात ठेवण्यात आले आहेत. येथील परिस्थितीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे लक्ष ठेऊन आहेत.
भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ
भाज्यांचा पुरवठा आता 2 मेपर्यंत बंद राहणार असल्याने सध्या उपलब्ध असलेली भाजी विकली जात आहे. ही भाजी आणखी दोन दिवस पुरण्याची शक्यता आहे. मात्र काही किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दरात थोडीशी वाढ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत. उपलब्ध भाज्यांचे दर आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.