दिल्लीत पोलीस-दहशतवाद्यांमध्ये चकमक : पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत घातपात करण्याच्या बेतात असणाऱया पाच संशयितांना अटक करत सोमवारी सुरक्षा दलाने मोठी कामगिरी बजावली. दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाने पाच संशयितांना एका थरारक चकमकीनंतर अटक केली आहे. त्यांच्याकडे बरीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि अन्य दस्तावेज सापडला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या पाचपैकी दोघे पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादी असून तिघे काश्मीरमधील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि दहशतवादी यांच्यात शहरातील शकरपूर परिसरात चकमक उडाली. दहशतवाद्यांचा कट उधळून लावत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. काही दहशतवादी शकरपूर परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्या भागात छापे घातले. या कारवाईवेळी संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर देत पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सुरक्षा दलाच्या विशेष तुकडीचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली. सदर दहशतवाद्यांचा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दहशतवाद्यांच्या कटासंबंधी चौकशी सुरू
नार्को टेररिझमसाठी या दहशतवाद्यांना आयएसआयचे समर्थन मिळाले होते. ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत, याची अजून माहिती मिळाली नसून त्यांची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा नेमका उद्देश काय होता. ते कोणासाठी काम करणार होते, याची माहिती चौकशीतून मिळविली जात आहे. हे संशयित दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली.
दहशत माजवण्याचा कट?
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांचे मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीची कोंडी झाली आहे. त्याचा गैरफायदा घेत शहरात दहशत माजवण्याचा या दहशतवाद्यांचा विचार होता का याची तपासणी केली जात आहे. तसेच त्यांच्याकडे सापडलेल्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तपासणीही केली जात आहे. यांचा संबंध अंमली पदार्थ तस्करीशी आहे. त्याच्या आडून ते देशविरोधी कारवाया करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.