पंतप्रधानांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल : भाजपचेही सडेतोड प्रत्युत्तर, पीएमओचेही निवेदन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनने भारतात घुसखोरी केलीच नसल्याचा पंतप्रधानांचा दावा आणि यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाकडून घुसखोरीसंबंधी दिलेले स्पष्टीकरण यावरून शनिवारी बराच वादंग निर्माण केला. पंतप्रधान खोटे दावे करून देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच बरेच नवे प्रश्नही उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत केलेल्या मुद्यांना अनुसरून गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ‘पीएमओ’ने सडेतोड प्रत्युत्तरही दिले आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच घुसखोरीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे शनिवारी दिवसभरात दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लडाखमधील तणावाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी “आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला.’’ असे म्हटले होते. पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसत असल्याने या मुद्यावरून राजकीय वातावरण तप्त झाले आहे.
गलवान खोऱयातील संघर्ष सध्या देशातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळय़ा वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्नउपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे. या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱयात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. तो व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना कडक शब्दात टोलवले आहे. “एका शूर जवानांच्या पित्याने स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने उभे राहायला हवे’’ असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
मतभिन्नतेमुळे आरोपांमध्ये भर
गलवान खोऱयात वाढलेल्या तणावानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवर चर्चा झाली होती. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्यानेही त्यावर खुलासा केला होता. 6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसा घडवल्याचे दिसून येत आहे. चीनने गलवान खोरे आपल्याच हद्दीत असल्याचा दावा केला आहे. भारताने आमच्या हद्दीत घुसखोरी केली आणि याठिकाणी बांधकाम सुरु केले. 6 जूनला झालेल्या बैठकीत इथून निगराणी पथके हटवण्याचे भारताने मान्य केले होते. पण तसे झाले नसल्याचे चीनने म्हटले आहे.
चिनी सैन्यामुळेच तणाव : अमेरिका
अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा (सीसीपी) त्यांच्या शेजारी राष्ट्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वाईट आहे. तसेच सरकार कमकुवत करण्यासाठी सायबर मोहिमेद्वारे ते अमेरिका आणि युरोपमध्ये खोटा प्रचार करत आहे. तसेच चीन विकसनशील देशांना चीनवरील अवलंबित्व वाढवून आणि कर्जाच्या ओझ्याखाली ठेवण्याचे काम करत असल्याचे मत अमेरिकेचे पररराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी व्यक्त केले. तसेच चिनी सैन्यामुळेच भारत चीन सीमेवर तणावर निर्माण झाल्याचे ते म्हणाले.