बंगालमध्ये तीन प्रकारच्या लोक- अमित शाह यांच्याकडून ममता बॅनर्जी लक्ष्य
पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी प्रचारसभेला संबोधित केले आहे. भाजप 122 जागांवर आघाडीवर असल्याचे म्हणत शाह यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. भाजप बंगालमधील ‘बॉम्ब, बंदूक आणि बारुद (दारूगोळा)’ हे मॉडेल बदलून ‘विश्वास, विकास आणि व्यापार’ करू इच्छितो. बंगालमध्ये घुसखोर, सर्वसामान्य नागरिक आणि शरणार्थी अशा तीन प्रकारचे लोक राहत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
देशभरात तसे पाहिल्यास एकाच प्रकारचे नागरिक आहेत, पण बंगालमधील स्थिती वेगळी आहे. ममतादीदींना घुसखोरांची मोठी पसंती मिळते. केवळ भाजपच बंगालला घुसखोरीपासून मुक्त करू शकते. तर माझ्या आणि तुमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांना बंगालमध्ये दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
तर मतुआ आणि नामशूद्र यासारख्या शरणार्थींना 70 वर्षांपासून नागरिकत्व तसेच सन्मानजनक जीवन मिळालेले नाही. त्यांना नागरिकत्व मिळायला हवे आणि भाजपच ते मिळवून देणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जींकडे बंगालच्या विकासाचे कुठलेच धोरण नाही. ममतादीदी 12 मिनिटांचे भाषण करतात आणि यातील 10 मिनिटे मोदींना आणि मला शिव्या देत राहतात. तर उर्वरित दोन मिनिटे सुरक्षा दलांवर आरोप करण्यात घालवतात. बंगालमधील तरुणाई आज रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये धाव घेत आहे. पण 5 वर्षांमध्ये प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला आहे.
घुसखोरांमुळे लोकांना त्रास
घुसखोर बंगालच्या लोकांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतात. बंगालच्या लोकांच्या हक्काचे धान्य पळवितात. बंगालमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवून टाकतात. घुसखोरी रोखण्याचे काम केवळ भाजपच करू शकते असे उद्गार शाह यांनी काढले आहेत. काही दिवसांपूर्वी एक ध्वनिफित समोर आली आहे. यात ममतादीनी कूचबिहारमध्ये मारले गेलेल्या 4 जणांच्या मृतदेहासह रॅली काढण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. ममता बॅनर्जी मृतदेहांवरूनही आता राजकारण करत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.