दोडामार्ग – वार्ताहर-
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटगे गावातील शेतकऱ्यांचे केळीच्या बागांची नुकसानी झाली आहे. गावातील जवळजवळ 50 ते 60 एकर जमीन क्षेत्रात ही नुकसानी झाली असून सलग चार वर्षात घोटगे गावाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसतो आहे.
गेल्या मंगळवारी व बुधवारी झालेल्या अवकाळी पावसात दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावागावातील शेती बागायतींचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी आंबा काजू कलमे तसेच केळी सुपारी यांची झाडे उन्मळून पडून ही नुकसानी झाली आहे. तालुक्यात घोटगे हा गाव केळी बागायतींसाठी विशेष प्रसिद्ध असून काल परवाच्या वादळी पावसात अनेक केळी अर्ध्यावर मोडून पडत नुकसान ग्रस्त झाले आहेत. गावातील जवळजवळ 50 ते 60 एकर जमीन क्षेत्रातील केळी बागायतींना या पावसाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरत दळवी, विजय दळवी, महेंद्र दळवी, संदीप नाईक, संजय दळवी, आत्माराम दळवी, शंकर दळवी, संतोष गवस, श्रीराम दळवी, श्रीपाद दळवी, संतोष दळवी, सोमा गवस, संदीप दळवी, सतीश परब, भास्कर दळवी, नरेश काळबेकर, मनोज दळवी, सहदेव दळवी, अरुण दळवी, स्वप्नील दळवी, पांडुरंग दळवी, बाळा दळवी आदींचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे मोर्ले गावातील अनेक शेतकऱ्यांची काजू कलमे जमीनदोस्त झाली आहेत.