ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घोलप महाविद्यालयामध्ये ‘मी सावित्री बोलतेय‘ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे यांच्या हस्ते या प्रयोगाचे उद्घाटन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, सादरकर्त्या डॉ. वृषाली रणधीर , जितेंद्र वडशिंगकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आजचे एकपात्री प्रयोग आयोजन करण्यामागे असलेले उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. विशेषतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती होणे आवश्यक आहे असे नमूद करत समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा मोडण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उपस्थितांसमोर स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे यांनी सर्वप्रथम सामाजिक उत्तरदायित्वातुन सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या एकपात्री प्रयोगाचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाद्वारे त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत असताना १८९३ साली सासवड येथे झालेल्या व सावित्रीबाई फुले यांनी अध्यक्षपद भूषविलेल्या सत्यशोधक समाजाच्या २० व्या परिषदेवर विशेष प्रकाश टाकला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहत या प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या.
‘मी सावित्री बोलतेय‘ या एकपात्री प्रयोग सादरीकरण करत असताना वाडिया महाविद्यालयातील डॉ. वृषाली रणधीर यांनी या एकपात्री प्रयोगातुन सावित्रीबाईंच्या जीवनातील विविध प्रसंगाचा जिवंत देखावा उपस्थितांसमोर उभा केला. विशेष म्हणजे भारतातील पहिली मुलींची शाळा काढताना सावित्रीबाईंनी तोंड दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करत असताना उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. तसेच आपल्या अस्सल ग्रामीण भाषा शैलीमध्ये सादरीकरण करत डॉ. वृषाली रणधीर यांनी शेवटपर्यंत उपस्थितांना खिळवून ठेवले.
या एकपात्री प्रयोगातुन सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची माहिती करून दिल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त करत प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे आभार मानले.