कोल्हापूर / प्रतिनिधी
आज सोमवार दि. 10 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद आवारात ‘चंदगड भवन’ या वास्तूचा उद्घाटन सोहळा होत आहे, त्यानिमित्त…
चंदगड तालुक्याची दुर्लक्षित, दुर्गम, मागास ही आजपर्यंतची सर्वदूर ओळख. इथल्या समस्या नेतेमंडळीना ज्ञात आहेत. या सर्व समस्यांच्या गर्तेतील मूळ वेदना म्हणजे येथील जनतेची होणारी हेळसांड. जिल्हय़ाच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे संपूर्ण दिवस खर्ची पडतो. आणि मुक्काम करायचा म्हणजे खिशाला परवडत नाही. या पार्श्वभूमिवर आज चंदगडकरांच्यादृष्टीने एक मौलिक घटना घडते ती म्हणजे कोल्हापूर येथे चंदगडकरांचे स्वतःच्या हक्काचे घर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आवारात चंदगड भवन वास्तू उभारली गेली. ही चंदगडकरांची मोठी सोय आहे. या मातीची ही साद होती. मूळ वेदना होती. या समस्यापूर्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे जिल्हा परिषद सदस्य कलाप्पा भोगण, जिल्हा परिषद सदस्या सौ. विद्या विलास पाटील आणि सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे कार्य चंदगडची जनता नेहमीच लक्षात ठेवेल.
व्हीआयपी लोकांची सोय, व्हीआयपी पध्दतीनेच होते. यात शंका नाही. पण गोरगरिब जनतेची सोय म्हणजे सेवा करण्याची फलप्राप्ती यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. चंदगडकरांच्या दृष्टीने चंदगड भवन हा जिव्हाळय़ाचा प्रश्न आकाराला येत असताना प्रत्येक नागरीकांची छाती अभिमानाने फुलत आहे. लोक या सत्कार्याला दुवा देत आहेत. सामान्य जणांचा हा दुवा, आशीर्वादात रूपांतरीत होणार आहे.
या उद्घाटनच्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट आज अधोरेखित होत आहे. तो म्हणजे श्रेयवादाचा मुद्दा. हा गौण समजा. नवरा-बायकोच भांडण हे घरगुती असत. ते चव्हाटय़ावर मांडायच नसत. याच भान सर्वांनी जपलं आहे. सुर्य लपवून ठेवता येत नाही. कोंबड झाकून ठेवल म्हणजे सुर्य उगवायचा थांबत नाही. समाजकार्य आणि सत्कार्यासाठी तुम्ही एका जाजमावर बसा. अहंकार, प्रतिष्ठा, शेयवाद जाळून टाका. पण जिल्हय़ात तमाशा मांडू नका. तुम्हा सर्वांचा वाटा आहे. सर्वांनी मिळून केला आहे. किंबहुना हे आम्हीच केल आहे, हे तुम्ही तुमच्या मतदारांवर बिंबवा.
हे जे कार्य आज होत आहे. ते चंदगडच्या जनतेसाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. याला पक्षीय लेबल कशासाठी? कोणालाही कोणी कमी लेखू नये. प्रत्येकाचा खारीचा वाटा असतो. हे मान्य कराव. पण जाणीवपूर्वक चंदगड तालुक्याची अब्रू वेशीवर टांगू नका. गोकुळ दूध संघात पायओढणी झालीय ना… जिल्हय़ाचे नेते हसत आहेत, तुमच्या या कर्तबगारीला. चांगल्याला चांगल म्हणा. श्रेयवाद सोडा. सर्वांनी एकत्र या. माझं घरात ठेवा आणि चांगल्याला चांगल म्हणा. लोकांत संभ्रम निर्माण करू नका. कार्यक्रमासाठी प्रोटोकॉल, कोरोनाचा आडोंबा घालू नका. सर्वांनी सामील व्हा, करणाऱयांच्या पाठिशी राहुया…